Pune News : येडगाव धरणग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी येडगाव धरणात पाणीसाठा राखून ठेवावा. कृषी उपसा जलसिंचन योजनांचा वीजपुरवठा खंडित करू नये. या मागणीसाठी येडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवरी (ता. ३०) सकाळी नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ कार्यालयावर मोर्चा काढला.
या वेळी येडगावच्या सरपंच सीमा भोर, माजी सरपंच बाबाजी नेहरकर, देविदास भोर, सह्याद्री भिसे, हर्षल गावडे, अंकुश भोर, हनुमान भोर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबाजी नेहरकर म्हणाले, की या भागातील शेतकरी धरणग्रस्त आहेत. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरली आहे.
धरणग्रस्त शेतकऱ्यांचा पाण्यावर पहिला हक्क आहे. धरणग्रस्त शेतकऱ्यांना बाराही महिने पाणी उपलब्ध करून द्यावे. शेतकरी वर्ग अडचणीत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये वीजपुरवठा खंडित करू दिला जाणार नाही. हक्काच्या पाण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन केले जाईल.
कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर म्हणाले, की शिरुर नगर परिषद व शिरूर ग्रामपंचायतीसाठी (ग्रामीण) ४.३९ दलघमी पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे.
या मुळे येडगाव धरणातून कुकडी नदीत ३५० क्युसेकने पाणी दोन आठवड्यांपूर्वी सोडण्यात आले आहे. मात्र जुन्नर ते शिरूर दरम्यान कुकडी नदीत असलेल्या कृषी उपसा सिंचन योजनांमुळे अद्याप शिरूरला पाणी पोहोचले नाही. यामुळे तात्पुरता वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. डिंभे धरणातून येडगाव धरणात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे येडगाव धरणाची पाणी पातळी स्थिर राहणार आहे.
कुकडी प्रकल्प हा आठमाही प्रकल्प असून कालवा सल्लागार समितीमध्ये झालेल्या निर्णयानुसार येडगाव धरणात पिण्यासाठी राखीव पाणीसाठा ठेवून पाण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. शेतकऱ्यांनी गैरसमज करू नये.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.