Unseasonal Rain : अडीच हजार हेक्टरला अवकाळी पावसाची बाधा

Crop Damage : यामुळे पाच हजार २५ शेतकरी बाधित झाले असून, या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे नऊ कोटी निधीची मागणी केली आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon

Dharashiv News : जिल्ह्यात एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, यात सर्वाधिक बाधा फळपिकांना बसली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यानुसार लातूर जिल्ह्यात एक हजार २२३, तर धाराशिव जिल्ह्यातील एक हजार ४३५ हेक्टरवरील पिके व फळपिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

यामुळे पाच हजार २५ शेतकरी बाधित झाले असून, या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे नऊ कोटी निधीची मागणी केली आहे. दरम्यान, मे महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून यातही फळपिकांना सर्वाधिक बाधा पोहोचल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वीज पडून शेतकरी व जनावरांचा मृत्यू होण्यासह घरांचीही पडझड झाल्याचे चित्र आहे.

दोन्ही जिल्ह्यांत ११ एप्रिल व २० एप्रिलनंतर वादळी वारा व गारांसह अवकाळी पाऊस झाला. या पावसाने रब्बी ज्वारीचे मोठे नुकसान झाले. धाराशिव जिल्ह्यात १४१ हेक्टरवरील तर लातूर जिल्ह्यातील २४ हेक्टरवरील ज्वारीला फटका बसला. फळपिकांमध्ये सर्वाधिक फटका आंबा फळाला बसला असून गारपीट व वादळी वाऱ्यामुळे आंबा गळून पडला.

Crop Damage
Crop Damage : नगर जिल्ह्यात एका महिन्यात पावसाने दोनशे हेक्टरवर नुकसान

वादळाने झाडाखाली आंब्याच्या कैऱ्यांचा सडा पडला. लातूर जिल्ह्यात एक हजार ७५ हेक्टरवरील फळांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून त्यात सर्वाधिक क्षेत्र आंब्याचे आहे. धाराशिव जिल्ह्यात बाधा पोहोचलेल्या एक हजार २२० हेक्टर फळ क्षेत्रापैकी एकट्या आंब्याचे क्षेत्र ९५६ हेक्टर आहे. त्यानंतर आंबा, द्राक्षे, डाळिंब, पेरू, लिंबू, केळी, पपई व अन्य पिकांचेही अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

फळपिके सोडून बागायती पिकांचेही नुकसान झाले असून, यात कांदा, मिरची, भाजीपाला, पानमळा, टोमॅटो, कलिंगड आदी पिकांना बाधा पोहोचली आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांना तीन हेक्टरपर्यंत भरपाई देण्यात येते.

जिरायत पिकांसाठी हेक्टरी १३ हजार सहाशे रुपये, बागायत पिकांसाठी हेक्टरी २७ हजार रुपये तर फळपिकांसाठी हेक्टरी ३६ हजार रुपये भरपाईची तरतूद आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सरकारकडे निधीची मागणी केली आहे. दोन्ही जिल्ह्यांत तीन हेक्टर क्षेत्राच्या आतच नुकसान झाले आहे.

Crop Damage
Crop Damage : खानदेशात वादळात केळीसह अन्य पिकांची मोठी हानी

आठ हजार कोंबड्यांचा मृत्यू

दरम्यान, २५ मेपासून दोन्ही जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. धाराशिव जिल्ह्यातील १२६ गावांना मे मधील अवकाळी पावसाची बाधा झाली. यात कळंब तालुक्यातील तीन पोल्ट्री फॉर्मचे शेड उद्ध्वस्त होऊन आठ हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. दोघे जण वीज पडून मृत्यू झाले, तर चौघे जखमी झाले आहेत.

२५ जनावरांचा मृत्यू झाला असून ३० पक्क्या तर ८६० कच्चा घरांची अंशतः पडझड झाली आहे. २११ गोठ्यांचे नुकसान झाले असून, ९० शेतकरी बाधित झाले आहेत. फळ व बागायती पिकांनाही फटका बसल्याच प्राथमिक अंदाज आहे. लातूर जिल्ह्यातील मे महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.

लातूर जिल्हा नुकसान

 बाधित शेतकरी - २३८३

 बाधित क्षेत्र - १२२३ हेक्टर

 भरपाईसाठी निधी मागणी

 चार कोटी २३ लाख

धाराशिव जिल्हा नुकसान

 बाधित शेतकरी - २६४२

 बाधित क्षेत्र - १४३५ हेक्टर

 भरपाईसाठी निधी मागणी

 चार कोटी ७८ लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com