Malshiras News : तालुक्यातील निमगाव अकलूज, माळेवाडी, खंडाळी, वेळापूर, मळोली आदी भागांमध्ये बुधवारी (ता.२२) सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान झालेल्या जोराचा वादळी वारे आणि पावसामुळे केळीच्या बागा भुईसपाट झाल्या असून आंबा उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शासनाने तत्काळ पंचनामे सुरू करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
बुधवारी सायंकाळी आलेल्या जोराच्या वाऱ्यामुळे पोटच्या मुलाप्रमाणे ऐन उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी देऊन तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या केळीच्या बागा क्षणात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनी डोळ्यादेखत पाहिल्या. यामुळे बळिराजावर संक्रांत आली असून झालेले नुकसान कशा पद्धतीने भरून निघणार याच चिंतेने बळिराजा ग्रासला आहे.
अकलूज-माळेवाडी येथील राजेंद्र बोडके व सुनील बोडके या दोन्ही बंधूंचे काढणीला आलेली पाच एकर केळीची बाग त्यांच्या डोळ्यादेखत वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त झाली असून हातातोंडाला आलेली केळीची बाग गेल्याने बोडके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गत पाच ते सात वर्षांमध्ये निमगाव व परिसरामध्ये आंबा फळबागेची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली असून आंबा काढणीचा हंगाम मध्यावर येऊन ठेपला असताना वादळ वाऱ्याने आंबा बागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आंबा झाडावरील अपरिपक्व फळे वादळी वाऱ्याने गळून पडल्याने या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.