
Pune News : देशातील हळद पिकाचे गुणवत्तापूर्ण आणि अन्न सुरक्षा मानकांप्रमाणे उत्पादन करण्यासाठी तसेच निर्यातीची बाजारपेठ वाढविण्यासाठी राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना करण्यात आली. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते निजामाबाद येथे उद्घाटन करण्यात आले. हळदीचे मूल्यवर्धन, उद्योगांचा विकास, जागरुकता आणि प्रसार हळद बोर्डामार्फत केला जाणार आहे.
हळद बोर्ड शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमता आणि कौशल्य विकासाठी काम करणार आहे. तसेच हळदीमध्ये मुल्यवर्धन करून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न कसे मिळेल, यासाठीही काम केले जाणार आहे. देशातील बाजारात आणि जागतिक बाजारात जास्त दर मिळावा यासाठी गुणवत्ता तसेच अन्न सुरक्षा मानकांचे पालन करण्यासाठीही काम करणार आहे.
भारतात तंबाकू बोर्ड आहे. हे बोर्ड देशातील तांबाकुची लागवड आणि व्यापारावर नियंत्रण ठेवत असते. त्याप्रमाणे हळद बोर्ड काम करेल. हळद क्षेत्राचा विकास आणि वाढ होण्यासाठी हळद उत्पादन, हळद उद्योगांचा विकास, निर्यात अशा आघाड्यावर मसाले बोर्ड आणि इतर सरकारी संस्थांसोबत काम करेल. हळदीकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. सरकारी पाठबळाअभावी हळद उत्पादकांनादेखील मोठा फटका बसत असतो. त्यासाठी सरकारने पुढाकार घत हळद बोर्डाची स्थापना केली आहे.
हळद बोर्डाचे अध्यक्ष सरकारकडून निवडले जाणार आहे. या बोर्डाचे सदस्य आयुष मंत्रालय, औषधनिर्माण विभाग, कृषी मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, हळद उत्पादक राज्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी, संशोधक शास्त्रज्ञ, हळद उत्पादक आणि निर्यातदारांचे प्रतिनिधी सदस्य असतील, असेही वाणिज्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
हळद बोर्ड पारंपरिक ज्ञानासोबतच नविन उत्पादनांसाठी संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देणार आहे. जागतिक पातळीवर हळदीला औषधी गुणधर्म आणि आरोग्यसाठी पोषक म्हणून चांगली मागणी असते. हळद बोर्ड हळदीविषयी जागरुकता आणि वापर वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच निर्यात वाढीसाठी नविन बाजारपेठांचा शोध घेतला जाणार आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.
जागातिक पातळीवर हळद बाजारात भारताची वेगळी ओळख आहे. भारत हळद उत्पादन, वापर आणि निर्यातीत जागतिक पातळीवर आघाडीवर आहे. भारतात जवळपास सव्वातीन लाख हेक्टरवर हळदीची लागवड होते. तर उत्पादन १० ते १२ लाख टनांच्या दरम्यान होते. जगातील एकूण उत्पादनापैकी जवळपास ८० टक्के उत्पादन भारतात होते. भारतातील जवळपास २० राज्यांमध्ये हळदीचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू ही राज्ये आघाडीवर आहेत. देशात जवळपास हळदीच्या ३० वाणांची लागवड केली जाते.
भारताने चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान जवळपास १ लाख ९४ हजार टनांची निर्यात केली. मागील वर्षी याच काळातील निर्यात १ लाख ६० हजार टन होती. बांगलादेश हा भारताच्या हळदीचा मोठा ग्राहक आहे. तसेच युएई, अमेरिका आणि मलेशियाला जास्त निर्यात होते. सरकारला हळद निर्यातीची बाजारपेठ १०० कोटी डाॅलरवर न्यायची आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.