
Pune News : पुणे : प्रतवारी करून व्यापारी व दलाल शेतकऱ्यांची लूट करू लागले आहेत. जुने व नवीन आले खरेदी करण्याच्या गेल्या दोन वर्षांतील निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. संगनमताने होत असलेली आले उत्पादकांची लूट थांबवण्यासाठी सरसकट आले खरेदीच्या पणनमंत्री यांनी विधानभवनात दिलेल्या निर्णयाची अमलबजावणी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
पुणे येथे पणन संचालक विवेक रसाळ यांची शेट्टी यांनी गुरुवारी (ता. २५) भेट घेतली. सातारा, औरंगाबाद व सांगली जिल्ह्यांमध्ये सरसकट आले खरेदीसाठीचे आंदोलन चांगलेच पेटले आहे. यंदा आल्याचे दर वाढल्यानंतर आले खरेदीमध्ये जुने आणि नवे आले पद्धत सुरू करून शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे. त्यामुळे आले उत्पादक अडचणीत सापडला आहे. त्या विरोधामध्ये सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र आंदोलन उभे केले आहे. या आंदोलनामुळे पावसाळी अधिवेशनात सरसकट आले खरेदीचा निर्णय पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी सभागृहात जाहीर केला.
मात्र तरीही काही मस्तवाल व्यापारी आल्याच्या खोडवा पिकाच्या नवीन मालाचा वेगळा दर आणि जुन्या मालाचा वेगळा दर करून शेतकऱ्यांना नाडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी अडीच ते तीन लाख रुपये नुकसान सोसावे लागत आहे. प्रतवारी केलेले दोन टन आले स्वाभिमानीने पुणे बाजार समितीत जप्त केले. समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर प्रकार घालून असे पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश शेट्टी यांनी पणन संचालकांना दिले.
या वेळी पुणे बाजार समितीचे सचिव होळकर, ‘स्वाभिमानी’चे प्रवक्ते अनिल पवार , ॲड. योगेश पांडे, प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, शरद खाडे, दत्तू काका घारगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.