
Jalgaon News : खानदेशात उशिराच्या मृग बहर केळी बागांची लागवड सुरू आहे. लागवड पावसामुळे रखडली होती. त्यात आता उघडीप आहे. पण आगाऊ नोंदणी करूनही अनेक पुरवठादारांकडून उतिसंवर्धित केळी रोपांचा पुरवठा होत नसल्याने लागवड रखडत सुरू आहे.
खानदेशात अनेक संस्था, पुरवठादारांकडून विविध वाणांच्या उतिसंवर्धित केळी रोपांचा पुरवठा केला जातो. मागील पाच ते सहा वर्षात उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड वाढत आहे. अनेकांनी कंद लागवड बंद करून दर्जेदार, निर्यातक्षम केळी उत्पादनावर भर दिला आहे.
यात दर चांगले मिळतात तसेच नफाही अधिकचा राहतो. उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड, पुढे खते, फ्रूट केअर व्यवस्थापन यासंबंधी खर्च लागतो. यामुळे अनेकांनी केळी लागवड कमी केली आहे. लागवड कमी करू, पण उतिसंवर्धित केळी रोपांना प्राधान्य देवू, असा विचार शेतकऱ्यांत आहे.
कंदांना उठाव
उतिसंवर्धित केळी रोपांची काढणी केल्यानंतर त्यातील कंद लागवडीसाठी वापरले जातात. एका झाडानजीक चार ते पाच दर्जेदार कंद मिळतात. या कंदांना प्रतिकंद तीन, चार रुपये दर असतो. यामुळे अनेक शेतकरी कंद विक्रीतूनही नफा मिळवितात.
अलीकडे उतिसंवर्धित केळी बागांमधील कंदांना मोठी मागणी आहे. कारण ११ महिन्यात उत्पादन मिळते. तसेच चांगले व्यवस्थापन केल्यास या कंदांद्वारे निर्यातक्षम केळीचे उत्पादनही साध्य केले जाते.
यामुळे उतिसंवर्धित केळी रोपांच्या लागवडीवडे शेतकऱ्यांचा कल सतत वाढला आहे. केळी रोपांचे वेगवेगळे दर आहेत. त्यात १२ ते १७ रुपये प्रतिरोप (पोच), असे दर आहेत. राज्यातील जळगावसह नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, मध्य प्रदेश, गुजरातमधील विविध कंपन्या रोपांचा खानदेशात पुरवठा करतात.
उतंसवर्धित केळी रोपांची टंचाई यंदा कायम आहे. या महिन्यातही ती कायम आहे. टंचाईची अडचण लक्षात घेता रावेर, मुक्ताईनगर, यावल आदी भागातील केळी उत्पादक नियोजित क्षेत्रात केळी रोपे लागवडीच्या सहा महिन्यांपूर्वीच केळी रोपांची आगाऊ नोंदणी (बुकिंग) पुरवठादारांकडे करतात.
खानदेशात कांदेबाग व मृग बहर हे केळीचे मुख्य दोन हंगाम आहेत. तसेच काही शेतकरी आगाप व उशिराचे कांदेबाग, उशिराचे मृग बाग असेही व्यवस्थापन करतात. कांदेबाग केळीची लागवड सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात केली जाते. यात अनेक जण डिसेंबर व जानेवारीतही उशिराच्या बागांची लागवड करतात.
मृग बहर केळीची लागवड मे पासून सुरू होते. ही लागवड जुलैच्या अखेरीसही केली जाते. काही शेतकरी ऑगस्टमध्येही उशिराच्या बागांची लागवड करतात. तर अलीकडे सुरवातीच्या दरांचा लाभ घेण्यासाठी फेब्रुवारी ते एप्रिल या काळातही केळी लागवड केली जात आहे. केळी लागवडीचे विविध पॅटर्न खानदेशात असून, बारमाही केळी लागवड केली जात आहे.
रोपांना वाढती पसंती
खानदेशात दोन्ही हंगामांतील केळी बागांची एकूण ६० हजार हेक्टरवर लागवड केली जाते. यात सर्वाधिक लागवड मृग बहरात असते. जळगाव जिल्ह्यातील लागवड ५२ ते ५३ हजार हेक्टरवर असते. यात नंदुरबार, धुळे व जळगाव या तिन्ही जिल्ह्यांत केळी पीक असून, तिन्ही जिल्ह्यांत उतिसंवर्धित केळी रोपांखालील क्षेत्र ४५ टक्क्यांवर गेले आहे.
पूर्वी उतिसंवर्धित केळी रोपांखालील क्षेत्र अल्प होते. हे क्षेत्र फक्त रावेर, यावल, मुक्ताईनगर पुरतेच मर्यादित होते. अलीकडे जळगावातील चोपडा, जळगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा व अक्कलकुवा भागातही उतिसंवर्धित केळी रोपांची मागणी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.