
Pune News : पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक झाले आहेत. हमीभाव कायदा, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासह भूसंपादन आणि नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. तर १०१ शेतकऱ्यांनी दिल्लीकडे काल (ता.८) कूच केली होती. मात्र हरियाणा पोलिसांनी अवघ्या काही मीटर अंतरावर शेतकऱ्यांना रोखत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे 'दिल्ली चलो' आंदोलन पुन्हा एकदा स्थगित करण्यात आले आहे.
रविवारी पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभू निषेध स्थळापासून दिल्लीपर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे १०१ शेतकऱ्यांचा गट दिल्लीकडे निघाला होता. मात्र हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखले. यानंतर आंदोलक शेतकरी आणि सुरक्षा जवानांमध्ये उडालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी पाण्याचा मारा, रबरी गोळ्या झाडल्या. ज्यात अनेक शेतकरी जखमी झाले. यानंतर दिल्ली चलो मोर्चा काही काळासाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी केली.
यावेळी पंढेर म्हणाले की, केंद्राने शेतकरी आणि शेतमजुरांशी चर्चा न करण्याचे ठरवलेले दिसत आहे. ते आम्हाला रोखण्यासाठी बळाचा वापर करत आहेत. आम्ही शांततेने आणि शिस्तीने दिल्लीकडे निघालो होतो. आताही शांततेने आणि शिस्तीने जाऊ. पण पोलिसांनी केलेल्या दबावामुळे आमचे १६ शेतकरी जखमी झाले आहेत.
त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. काहींना किरकोळ दुखापत झाली. कृषिमंत्री संसदेत गोंधळ घालून शेतकऱ्यांसाठी सरकार काम करत असल्याचे सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात असे काही होताना दिसत नाही. आमची मागणी हमीभाव कायद्याची असून आम्ही यावर ठाम आहोत. पण कृषिमंत्रीच काय तर पंतप्रधान देखील यावर मौन बाळगून आहेत.
काल १२ वाजता आम्ही दिल्लीकडे निघालो. याआधी पोलिसांनी आमची ओळखपत्र पाहून सोडू असा पवित्रा घेतला होता. तर त्यांच्याकडे १०१ शेतकऱ्यांची यादी असल्याचे सांगितले होते. पण शेतकऱ्यांनी यावर नकार दिला असून पोलिसांना कोणतीही यादी दिली नसल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांनी एक दिवसाच्या स्थगितीनंतर पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केल्यानंतर पंजाब-हरियाणा सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली. रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले. तसेच कलम १६३ म्हणजेच जमावबंदी आदेश (पूर्वीचे कलम १४४) शंभू आणि खानोरी सीमेवर लागू केला. दोन्ही ठिकाणी सुरक्षा दलाच्या १३ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. तसेच राखीव बटालियन, जलद कृती दल, सीमा सुरक्षा दल आणि हरियाणा पोलीस देखील शंभू आणि खानोरी सीमेवर बंदोबस्तावर होते.
पोलिसांच्या प्रतिकारानंतर शेतकऱ्यांनी दिल्ली चलो मोर्चा काही काळासाठी थांबवला असून हरियाणा पोलिसांकडे आवश्यक परवानगी मागितली आहे. दरम्यान, सकाळपासून येथे संचारबंदी आदेश लागू करण्यात आला होता. तर आंदोलक शेतकऱ्यांचे ओळख आणि परवानगी तपासूनच पुढे सोडावे, असे आदेश होते. पण शेतकऱ्यांनी याला विरोध केला. यामुळेच पोलिसांना प्रतिकार करावा लागल्याचे शहाबादचे डीएसपी रामकुमार यांनी सांगितले. तसेच त्यांनी, शेतकऱ्यांनी शांतता राखावी आणि परवानगी घेऊन प्रवेश करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.