Nashik News : अंबासन येथील मालेगाव-नामपूर रस्त्यावरील निमदरा फाट्यानजीक रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातून पहाटेच्या सुमारास तब्बल ४० ते ४५ क्विंटल कांदा चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित शेतकऱ्याने जायखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या घटनेमुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मालेगाव-नामपूर रस्त्यावरील शेतकरी एम. एस. पाटील यांच्या शेतातील (गट क्रमांक ५२५/१) पाच एकर क्षेत्र युवा शेतकरी देविदास शामराव कोर याने तोडबटाईने केले आहे. देविदास यांनी शेतात कांदा लागवड केली होती. कांदा लागवडीपासून तर काढणीपर्यंत त्यांना एक लाख ३५ हजार रुपयांहून अधिक खर्च आल्याचे सांगितले.
काही दिवसांपूर्वीच दोन ट्रॉली कांदा त्यांनी विक्री केला होता. सध्या पावसाचे वातावरण असल्याने शेतात साठवून ठेवलेला दोन ते अडीच ट्रॉली कांदा मंगळवारी (ता. १४) कुटुंबीयांसह कांदा प्रतवारी करून विक्रीसाठी ट्रॉलीत भरत होते. सायंकाळी उशीर झाल्याने त्यांनी सकाळी कांदा भरण्याचे ठरविले.
दरम्यान, पहाटेच्या सुमारास पावसाचे वातावरण झाल्याने शेतात ट्रॉलीतील कांदा झाकण्यासाठी गेले असता त्यांना ट्रॉलीतील कांदा व शेतातील साठवलेला कांदा चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यामुळे युवा कांदा उत्पादक शेतकरी देविदास कोर यांनी तत्काळ ही माहिती कुटुंबीयांना दिली.
शेतात मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा चोरीला गेल्याने कुटुंबीयांना गहिवरून आले होते. दरम्यान, देविदास याने तातडीने वडनेर खाकुर्डी येथील मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. मात्र, रात्री अनेक वाहने जाताना दिसून झाली. यामुळे थांगपत्ता लागू शकला नाही. जायखेडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन कांदा चोरीची तक्रार दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली नाना पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.