Vardha News : आर्वी विधानसभेतील कारंजा, आष्टी तालुक्यांतील १०४ गावांतील जलजीवन मिशनची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप खुद्द आमदार दादाराव केचे यांनी केला असून, कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी मंत्रालयात केली आहे.
आर्वी विधानसभा मतदार संघातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यांतील एकूण १०४ गावांमध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण होत आहेत. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदारांनी केला आहे.
या बाबत उच्चस्तरीय कामाची चौकशी करून तत्पूर्वी सर्व कामांची बिले थांबवून कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे व उपविभागीय अभियंता यांना व कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
योजनेच्या कामा संदर्भात अनेक गावांतून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परंतु अधिकाऱ्यांनी त्या तक्रारीची दखल न घेता कंत्राटदारासोबत भागीदारी असल्यामुळे निकृष्ट दर्जाचे कामे झाले असताना त्यांचे बिले मात्र काढल्या जात आहेत. कामाकरिता वापरण्यात आलेले पाइप, खोदण्यात आलेली नाली यात नियम धाब्यावर बसवून कामे करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यामुळे वारंवार पाइप फुटण्याच्या घटना घडत आहेत. या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्या संगनमतानेच ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने त्यांना आणि कंत्राटदारावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केचे यांनी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.