
Nashik News : निफाड तालुक्यातील विंचूर लासलगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचे पाण्यासाठी होत असलेले हाल आणि गढूळ पाणीपुरवठा प्रकरणी निफाड तालुका पूर्व शिवसेनाप्रमुख प्रकाश पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार करत महाराष्ट्र दिनापासून (१ मे) बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
समितीच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक गावांना २० ते २५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
श्री. पाटील यांनी दिलेल्या पत्रानुसार लासलगाव विंचूरसह सोळा गाव योजनेचा पाणीपुरवठा सध्या खूप विस्कळित झाला आहे. तब्बल वीस ते बावीस दिवस झाले, तरीही पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जात नाही. कोणतेही कारण नसताना जनतेला पाण्यासाठी वेठीस धरण्याचा प्रकार समिती व सचिव करत आहेत.
पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे कैफियत मांडली होती. त्यावर ऑक्टोबर २०२२ मध्ये या योजनेची पाहणी करून त्यांनी सूचना केल्या होत्या. त्यानंतर किमान पाच सहा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता, तोही अशुद्धच होता.
विंचूरसह सोळा गाव पाणीपुरवठा दुरुस्ती करणाऱ्या देखभाल समितीकडून नांदुरमध्यमेश्वर धरणातून येणाऱ्या पाण्याचे विंचूर येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया होऊ शकते.
अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने परिपूर्ण असूनही त्याचा कुठल्याही प्रकारे वापर होत नसल्याने तेही बंद स्थितीत आहे. लासलगाव विंचुरसह सोळा गाव देखभाल दुरुस्ती समितीकडून राजरोसपणे नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात आहे असे पाटील यांनी म्हटले आहे.
सध्या नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विकतचे पाणी घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. लासलगाव विंचूरसह सोळा गाव पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती योजना समितीचे पदाधिकारी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत.
चौकशी करून ही समिती बरखास्त करावी तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या समितीच्या सचिवांवर कडक कारवाई करावी व नवीन अधिकारी नेमणूक करून नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नळाद्वारे किमान दिवसाआड करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
पाण्याची समस्या सुटेपर्यंत उपोषण
३ एप्रिलला प्रत्यक्षात भेटून पत्र विनंती केली होती. २५ ते २६ दिवस उलटूनही तक्रारीची गांभीर्यपूर्वक दखल घेतलेली नाही, असे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे एक मे २०२३ ला महाराष्ट्र दिनी सकाळी अकराला लासलगाव ग्रामपंचायत कार्यालय आवारात शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या सुटेपर्यंत बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा शिवसेनेचे निफाड तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी दिला आहे.
पत्राची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, आरोग्यमंत्री, गटविकास अधिकारी, पंचायत समिती निफाड, लासलगाव पोलिस, पाणीयोजनेचे अध्यक्ष व सचिव यांनाही देण्यात आली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.