Jalgaon News : खानदेशात उष्णता दिवसागणिक वाढत आहे. कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले असून, पिकांना मोठा फटका बसत आहे. मागील महिन्यात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत होते. या महिन्यातही कमाल तापमान सतत वाढत आहे. यामुळे पिकांनाही मोठा फटका बसत असून, केळी, भाजीपाला पिके होरपळत आहेत. उत्पादकतेसही फटका बसत आहे.
उष्णता वाढल्याने शेतीकामांना सतत फटका बसत आहे. मागील आठवड्यात तर सायंकाळी पाच ते साडेसात या दरम्यान अनेकांनी शेतीकामे उरकली. तर काहींनी सकाळी सहा ते नऊ या कालावधीत कामे उरकून घेण्यासाठी धावपळ केली आहे. सध्या शेतातून कुट्टीची वाहतूक, शेता खते, माती, गाळ टाकणे, पूर्वमशागत आदी कामे सुरू आहेत.
तसेच कापूस लागवडदेखील केली जात आहे. मागील महिन्यात कमाल तापमान सुरवातीला ४२ अंश सेल्सीअस होते. नंतर त्यात सतत वाढ झाली व कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोचले. या महिन्यातही पहिल्या पंधरवड्यात कमाल तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सीअसदरम्यान होते.
परंतु मागील तीन दिवसात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचल्याची नोंद विविध हवामान केंद्रांत झाली आहे. रविवारी (ता.१९) खानदेशात धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील नंदुरबार, तळोदा, शहादा, जळगावातील चोपडा, जळगाव, यावल, रावेर, जामनेर आदी तालुक्यांत कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. काही भागात कमाल तापमान ४५.९ अंश सेल्सिअसदेखील असल्याची नोंद झाली आहे.
सकाळी नऊ पासून ऊन तापत आहे. यामुळे पिकांना रोज सात ते आठ तास पाणी देवूनही पिकांची वाढ हवी तशी नाही. केळीची पाने पिवळी, लाल पडत आहेत. पोंगा लागलीच होरपळत आहे. दुपारी उष्ण वारा असतो. सायंकाळीदेखील उष्णता असते. रात्री १२ वाजेपर्यंत उष्णता असते. यामुळे केळीची पाने फाटली असून, प्रकाशसंश्लेषणाची गती, क्रिया संथ झाली आहे. केळीसह अन्य भाजीपाला पिकांची होरपळ होत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.