Vangi News : वांगी (ता. कडेगाव) परिसरातील जनावरांना मागील चार महिन्यांपासून ऊसतोडी सुरू झाल्यापासून वैरणीसाठी केवळ उसाचे वाढे आधार ठरले आहे. कारखाने बंद होताच हा प्रश्न बिकट होणार आहे.
ताकारी व आरफळ योजनेचे पाणी आल्यानंतर मागील २० वर्षांपासून या भागात बागायती क्षेत्रात प्रचंड वाढ झाली. तसेच शेतीपूरक पशुपालनावरही शेतकऱ्यांनी भर दिला. परिणामी पडीक क्षेत्रात घट होऊन सर्वत्र हिरवीगार पिके डोलू लागली. पडीक जमीन नसल्याने जनावरे चरावयास नेण्याचे बंद होऊन जागेवरच चारा दिला जात आहे.
बहुतांश शेतकरी ऊस व नगदी पिकाकडे वळल्याने हिरवा चारापिके घेतली जात नाहीत. केवळ हत्तीघास वापरला जात आहे. त्यातच मागील चार महिन्यांपासून साखर कारखाने सुरू झाल्यापासून वैरणीसाठी सर्रास वाढ्यांचा वापर होत आहे. शेतकऱ्यांना शंभर रुपयाला ३० पेंढ्या मिळतात व जनावरांना हिरवी वैरण दिल्याचे समाधान मिळते.
मात्र वाढे जनावरांच्या वैरणीसाठी तितकेसे उपयुक्त नसल्याचा निर्वाळा पशुतज्ज्ञ देत आहेत. मात्र याकडे शेतकऱ्यांचा कानाडोळा होत आहे. आणखी दीड-दोन महिन्यांनी साखर कारखाने बंद होताच वांगी परिसरास वैरणीची प्रचंड चणचण भासणार आहे. ओल्या चाऱ्याचे दर भडकण्याची शक्यता आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.