Jalna News : मराठा समाजाला जे १० टक्के आरक्षण शासनाने दिले यावर समाज समाधानी नाही. ज्यांना ते आरक्षण पाहिजे त्यांनी ते घ्यावे. आमची मूळ मागणी ही ओबीसीमधून टिकणारे आरक्षण आणि सगेसोयरे बाबत कायद्याची अंमलबजावणी ही आहे.
या मागणीसाठी राज्यात शनिवारपासून (ता. २४) ३ मार्चपर्यंत गावागावांत, शहरात व मुंबईमध्ये पहिल्या टप्प्यात तीव्र आंदोलन करण्याची दिशा बुधवारी (ता. २१) मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे समाज बांधवांच्या आयोजित बैठकीत जाहीर केली.
श्री. जरांगे म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर समाजाचा विश्वास आहे. त्यांनी गुलालाचा अपमान होऊ देऊ नये. दोन दिवसांत सगेसोयरे या कायद्याची अंमलबजावणी करावी. होत नसेल तर त्यांनी आरक्षण देण्याची शपथ अपूर्ण असल्याचे स्वत:हून जाहीर करावे. गुन्हे वापस घ्या, शिंदे समिती काय काम करते ते बघा.
गावात यादी लावली नाही, अभियान राबवले जात नाही. देवस्थान, भाट, हैदराबाद गॅझेटमधील नोंदी गृहीत धरा. कुणबी व मराठा ऐक आहे कॅबिनेटमध्ये याचा अध्यादेश काढा. शासनाने दिलेले १० टक्के आरक्षण आम्हाला नको आहे. समाज व न्यायालय यांचा मान राखत वैद्यकीय उपचार घेणार असल्याचे श्री. जरांगे यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यातील आंदोलन
राज्यातील प्रत्येक गावात, शहरात एकाचवेळी २४ फेब्रुवारीपासून ते ३ मार्चपर्यंत रोज सकाळी साडेदहा ते १ वाजेपर्यंत आणि सायकांळी ४ ते ७ या वेळेत रास्ता रोको आंदोलन होणार. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना प्रवासात अडचण आली तर त्यांना मदत करा, पोलिसांना अधिकृत निवेदन द्या.
पदावर असलेले आमदार, खासदार यांनी आमच्या दारासमोरून जायचे नाही, आम्हीही त्यांच्याकडे जाणार नाही.
मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक आयोगाने निवडणूक घेऊ नये, मोदी साहेब यांना विनंती आहे. निवडणुकीत नेत्यांच्या गाड्या आल्यास त्या जमा करून घ्या. निवडणूक संपल्यावर देऊन टाका.
राज्यात प्रत्येक गावात वृद्धासह सर्व उपोषणाला बसणार. त्यांना काही झाले तर त्याची जबाबदारी सरकारची असेल.
राजकारणी यांनी त्रास दिला तर जशास तसे उत्तर देऊ, पोलिसांनी अटक केली तर सर्व जण पोलिस स्टेशनला जातील.
१ मार्च रोजी राज्यातील सर्व पक्षांचे मराठा आमदार, खासदार यांची अंतरवाली सराटी येथे बैठक ठेवली आहे. यात त्यांना सगेसोयरे याची अंमलबजावणी का केली नाही बाबत समाज विचारणार आहे.
३ मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकाचवेळी दुपारी १२ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील सध्या राजकीय पदावर असलेल्यांनी राजकीय कार्यक्रमास जाऊ नये. गेलात तर त्याला आयुष्यभर मदत करू नका अशा सूचना देण्यात येतील.
मुंबईला जायाचे का नाही याची बैठक ३ तारखेनंतर ठरवले जाईल.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.