Solapur News : शेती महामंडळाकडून मूळ खंडकऱ्यांना जमिनी देताना दिलेला भोगवटादार वर्ग-दोनवरून भोगवटा एक करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असल्याने खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचा मालकी हक्क प्राप्त होणार आहे. या बाबत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधान परिषदेत पाठपुरावा केला होता.
शेती महामंडळाकडून मूळ खंडकऱ्यांना जमिनी देताना भोगवटादार वर्ग-दोन म्हणून स्व-कसवणुकीसाठी वाटप करण्यात आलेल्या आहेत. १० वर्षांनंतर या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु अजूनही मूळ खंडकऱ्यांच्या जमिनी वर्ग एक झालेल्या नव्हत्या.
त्यामुळे मूळ खंडकऱ्यांना जमिनीची खरेदी विक्री, कौटुंबिक हक्क, कर्ज या कामी विनियोग होत नव्हता. त्यादृष्टीने अभिलेख आणि नोंदवहीत भोगवटादार वर्ग २ रद्द करून वर्ग १ म्हणून तातडीने नोंद करण्याची तरतूद करण्यात यावी, म्हणून आमदार मोहिते-पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करत खंडकरी शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती.
तशा आशयाचे पत्र ही त्यांनी संबंधित विभागाला दिले होते. पण आता शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या जमिनी लवकरच त्यांच्या नावावर होणार आहेत.
आता खंडकरी शेतकरी कसत असलेल्या या जमिनीचा प्रकार बदलणार आहे. भोगवटा २ मधून भोगवटा १ मध्ये रूपांतरित होणार आहेत. त्यामुळे खंडकरी शेतकरी जमिनीचा कब्जेदार होणार असून, जमिनी विक्री, हस्तांतर करता येणार आहे. राज्यातील सुमारे चार हजार शेतकऱ्यांना यांचा फायदा होणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.