
Soil EC : तुम्ही जर तुमच्या शेतातील मातीचं परिक्षण करत असाल तर मातीचा सर्वात आधी सामू मोजला जातो. त्यानंतर इलेट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजेच क्षारता आणि त्याबरोबरचं जमिनीतील सेंद्रिय कर्बही मोजला जातो. कारण हे तिनही घटक जमिन सुपिकतेच्या दृष्टिकोणातून अत्यंत महत्वाचे आहेत. त्यातील पहिला घटक म्हणजे जमिनीचा सामू.
सामू हा सर्वसाधारणपणे ६.५ ते ७.५ पर्यंत असावा. कारण या दरम्यानच वनस्पतींना लागणारी बहुतेक अन्नद्रव्ये उपलब्ध होत असतात. आणि जर जमिनीचा सामू जर ८.५ पेक्षा जास्त असेल तर अशी जमीन चोपण असते. अशी जमीन सुधारण्यासाठी भूसुधारक म्हणून जिप्समचा शेणखतातून वापर करावा. तर चुनखडीयुक्त चोपण जमिनीची सुधारणा करताना जिप्सम ऐवजी गंधकाचा शेणखतातून वापर करावा. जमिनीचा सामू जर ६.५ पेक्षा कमी असल्यास त्याला आम्ल जमिनी म्हणतात. अशा जमिनी सुधारण्यासाठी चुन्याचा शेणखतातून वापर करावा.
माती परिक्षण अहवालातील दुसरा महत्वाचा घटक आहे जमिनीची क्षारता. क्षारांच प्रमाण हे प्रयोगशाळेत इलेट्रिकल कंडक्टिव्हिटी या उपकरणाने मोजली जाते. मातीतील विद्युत वाहकता म्हणजेच क्षारता जर १ पेक्षा जास्त असेल तर क्षारयुक्त जमीन म्हणतात. अशा जमिनीच्या वरच्या थरावर विरघळलेल्या क्षारांचा पांढरा थर दिसून येतो. मातीची क्षारता सर्वसाधारपणे ०.१० ते ०.९० या दरम्यानच असावी.त्यापेक्षा जास्त असल्यास चर खोदून जमिनीतून निचऱ्याची व्यवस्था करावी.
अशा जमिनीत जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. हिरवळीची पिके जमिनीत गाडावीत.चांगल्या प्रतीचे पाणी सिंचनास वापरून अतिरिक्त क्षारांचा निचरा करावा. चांगल्या प्रतीच्या पाण्याची क्षारता ही ०.५ पेक्षा कमी असते. ही क्षारता २.५पेक्षा जास्त असल्यास असं पाणी सिंचनास अयोग्य समजलं जातं. तर पाण्याची क्षारता ३.१५ पेक्षा जास्त असल्यास ठिबकसाठी अयोग्य समजलं जातं.
माती परिक्षण अहवालातील तिसरा महत्वाचा घटक म्हणजे सेंद्रिय कर्ब. जमिनीमधील सेंद्रिय कर्बाची सर्वसाधारण मर्यादा ही ०.४० ते ०.६० टक्के योग्य मानली जाते.अशा जमिनीचे जैविक, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म चांगले असतात. या जमिनीत पिकांची पोषण क्षमताही योग्य असते. त्यामुळे जमीन निरोगी राहण्यास मदत होते. जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जेवढे जास्त तेवढे ते पीक उत्पादन आणि जमिनीच्या भौतिक गुणधर्माच्या संवर्धनाच्या दृष्टीने चांगले असते.
त्यामुळे रासायनिक खते, सेंद्रिय खते, हिरवळीची पिके आणि जिवाणू संवर्धकांचा एकात्मिक वापर करून जमिनीची सुपीकता टिकवून पीक उत्पादन वाढविता येते. याशिवाय हवामान आपल्या जमिनीचा प्रकार, पीक पद्धती अशा निरनिराळ्या घटकांमुळे या प्रमाणावर परिणाम होत असतो आणि ते प्रमाण सतत बदलत असतं. म्हणूनच माती परीक्षणाच्या आधारे हे प्रमाण जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.