
Nashik News : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मंगळवारी (ता. १५) समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सिन्नर तालुक्यातील दुसंगवाडी येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी शिर्डीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरील वाहतूक पंधरा मिनिटे अडवली. या वेळी पोलिसांनी बाळाचा वापर करून आंदोलकांना बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन स्तरावरून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. वारंवार अर्ज, विनंती व आंदोलने करूनही प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने सिन्नरच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी थेट समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्यानुसार शेतकरी रस्त्यावर उतरले होते. तहसीलदार सुरेंद्र देशमुख, वावी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक चेतन लोखंडे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहअभियंता निंबादास बोरसे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना आंदोलन न करण्याची विनंती केली.
२८ ऑगस्ट रोजी सिन्नर तहसील कार्यालयात समृद्धी बाधित शेतकरी आणि रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहिती तहसीलदार देशमुख यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय शिंदे, नितीन अत्रे, भास्कर कहांडळ, अप्पा शिंदे, भास्कर वारुंगसे, मधुकर वारुंगसे, जगदीश ढमाले, सुभाष शिंदे यांच्यासह परिसरातील ५० ते ७० शेतकरी या वेळी उपस्थित होते.
सरकारने समृद्धीबाधितांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी.
समृद्धी लगतच्या शेतकऱ्यांचे पावसाळ्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान झालेल्या अपघातांमध्ये जीव गेलेल्या दहा स्थानिक तरुणांच्या वारसांना रस्ते विकास महामंडळामार्फत कायमस्वरूपी नोकऱ्या द्याव्यात.
सर्व्हिस रोडची अर्धवट कामे पूर्ण करावीत.
‘समृद्धी’साठी वापरल्या गेलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.