Farmer Death : कृषिमंत्र्यांनी फसवणूक केल्याची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा आरोप

Dhananjay Munde News : यवतमाळ येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी मनोज कवडू राठोड यांच्या कुटुंबियांची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले.
Dhananjay munde
Dhananjay mundeAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाप्रति कणव असल्याचे भासविणाऱ्या कृषिमंत्र्यांनी त्यांच्या भेटीसाठी न जाता त्यांनाच पक्ष कार्यालयात बोलावले. माध्यम प्रतिनिधी, पक्ष कार्यकर्त्यांसमोर या कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचेही जाहीर केले.

याला दोन महिने उलटून गेले असताना या कुटुंबीयांची साधी विचारपूस करण्यासाठी या कालावधीत कुणी त्यांच्याकडे गेले नाही. परिणामी कृषिमंत्र्यांनीच फसवणूक केल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.

Dhananjay munde
M S Swaminathan : शेतीत क्रांती घडवणाऱ्या स्वामीनाथन यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काय केलं होतं?

यवतमाळ जिल्ह्यातील येरद येथील रहिवासी (स्व.) मनोज कवडू राठोड (वय ३७) यांच्या कुटुबियांची ही व्यथा आहे. अडीच एकर शेती असलेल्या मनोज राठोड यांनी सोयाबीन लावले होते. त्यांच्यावर बॅंक ऑफ बडोदाचे अडीच लाख तर इतरही खासगी व्यक्‍तींचे काही लाखांचे कर्ज असल्याचे त्यांचे कुटुंबीय सांगतात.

त्यांच्या घरात पत्नी, आईसह चार मुली अशा सहा जणांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात पाऊस जास्त झाला, त्यामुळे शेतात तण वाढीस लागले. या विवंचनेत त्यांनी स्वातंत्रदिनी १५ ऑगस्टलाच गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

दरम्यान १८ ऑगस्ट रोजी कृषिमंत्री धनंजय मुंडे हे यवतमाळ दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी पक्ष कार्यालयाच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमस्थळीच आत्महत्याग्रस्त मनोज राठोड यांच्या पत्नी, चार मुलींना बोलावून घेतले. या वेळी त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना या कुटुंबीयांना तत्काळ मदत मिळावी, असे निर्देश दिले.

त्यानंतर भावनिक झालेल्या कृषिमंत्र्यांनी या कुटुंबातील चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे जाहीर केले. सरकार स्तरावर यासाठी निधीची उपलब्धता होत नसेल तर माझ्या संस्थेमार्फत मी मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान या संदर्भाने कृषिमंत्र्यांचे खासगी सचिव खेडक यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेऊन यवतमाळच्या पक्ष प्रतिनिधीमार्फत कुटुंबीयांशी संवाद साधला जाईल, असे त्यांनी सांगितले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येरद गावात पालकमंत्री संजय राठोड यांच्या शाळेत माझा भाऊ (कै.) मनोजच्या दोन मुली शिक्षण घेत आहेत. तर दोन मुली गावातील जिल्हा परिषद शाळेत आहेत. उदरनिर्वाहाचे साधन नाही, झोपडीवजा घर आहे. कृषिमंत्र्यांनी आधार देण्याची घोषणा केली. परंतू कृषिमंत्र्यांचे प्रतिनिधी तर दूरच तीन महिन्यांपासून प्रशासनातील अधिकारीही फिरकले नाहीत. त्यावरुनच आम्हा कुटुंबीयांची फसवणूक केल्याचे सिद्ध होते.
- विजय राठोड, मृत मनोज राठोड यांचे भाऊ
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आल्यानंतर अशाप्रकारचे दत्तक घेण्याचे जाहीर करुन वाहवा मिळविली जाते. यातूनच अशा लाचार कुटुंबियांच्या मानसिकतेचा फायदा नेते सातत्याने घेत आले आहेत. त्यामुळेच यवतमाळ जिल्ह्याची स्थिती तसूभरही बदलली नाही. आता कृषिमंत्र्यांनीही फसवणूक केल्याने कोणाकडून अपेक्षा करावी.
- मनीष जाधव,  जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com