
डॉ. विवेक भोईटे
China Development Model : जगातील सर्वच देशांमध्ये वेगाने शहरीकरण होत आहे. परंतु त्याचबरोबर निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. शहरे विकसित होताना खेडी मात्र भकास होतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचाच एक भाग म्हणून चीन दूतावासातर्फे शांघाय येथे जागतिक शहर दिन २०२४ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या जागतिक परिषदेत भारतातर्फे यशवंतराव चव्हाण सेंटर यांची प्रतिनिधी म्हणून चीनच्या राजदूतावासातर्फे निवड झाली होती.
एकूण आठ जणांच्या गटामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर आणि व्यावसायिकांचा समावेश होता. बारामतीच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने मला या परिषदेमध्ये सहभाग घेता आला. शांघाय येथे झालेल्या उत्तम जीवनशैलीसाठी लोककेंद्रित शहर तयार करणे आणि शाश्वत शहरीकरण, ज्ञानाची देवाणघेवाण, धोरण संवाद आणि सहयोगासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून काम करणे हे या परिषदेचे ध्येय होते.
पुढील पन्नास वर्षांचा आराखडा केवळ अभियंत्यांनी न करता त्यामध्ये समाजाच्या सर्व घटकांना जसे की शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, सरकारी विभाग, विविध क्षेत्रांतील अनुभवी नागरिक, विद्यार्थी आणि महिलांचा समावेश होता. विशेषतः हवामान बदल,पूर नियंत्रण, किनारपट्टीच्या पर्यावरणाची सुरक्षा, हरित विकास प्राधिकरण यासारख्या विविध संशोधन विभागांचा देखील यामध्ये समावेश होता. चीनमधील शाळा, महाविद्यालयामध्ये शहर विकासाबद्दल जनजागृती आणि आवड निर्माण करून विद्यार्थांचा प्रत्यक्ष सहभाग शहर नियोजनामध्ये केल्याचा दिसले.
शांघाय शहराच्या आराखडा विकास विभागातर्फे विविध पद्धतीच्या विकासाचे आराखडे तयार करण्यात आले होते. जमिनीच्याखाली त्रिस्तरीय रचनेमध्ये प्रामुख्याने जास्तीचा पाऊस झाल्यानंतर ड्रेनेज व्यवस्था, पाणी साठवणूक व्यवस्था त्याचबरोबर भूमिगत मेट्रो व्यवस्था, जमिनीच्यावर बांधकाम, बागबगीचा, पूल यांचे नियोजन दाखविण्यात आले. या पद्धतीने जमिनीच्यावर आणि जमिनीच्या खाली रचना तयार करताना खूप विकसित आराखडे तयार करण्यात आले आहेत.
या विकास विभागांमध्ये माहिती घेत असताना जुन्या शहरांचा विकास आणि नवीन शहरांचा विकास यासंदर्भातील शास्त्रोक्त पद्धतीने तयार करण्यात आलेल्या आराखड्यावरून भविष्यात नियोजन कशा पद्धतीने करावे, याचे एक उत्तम उदाहरण मांडणीद्वारे सादर करण्यात आले होते. कोणतेही शहर किंवा ग्रामीण भागाचा शाश्वत विकास करताना पुढील ५० ते १०० वर्षांचा विकास कसा असावा हे यावरून समजले. अपारंपरिक ऊर्जेचा वापर, सौर ऊर्जा यावर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे.
शाश्वत पद्धतीने ग्रामीण विकास
चीनमध्ये जुने शहर विकसित करताना खेड्यांच्याकडे तेवढेच लक्ष देण्यात आले होते. ग्रामीण भागाचा विकास करताना शाश्वत शेती विकासावर भर देण्यात आला होता. खेडेगावात फिरताना नदी आणि ओढ्यांचा नियोजनपूर्वक पर्यटनामध्ये वापर तसेच खेडेगावातील जुन्या इमारतींचा पर्यावरणपूरक कृषी पर्यटनासाठी उपयोग करण्यात आला होता. ग्रामीण भागात फिरताना हवामानावर आधारित शेती विकासाचे मॉडेल पाहायला मिळाले.
खेडेगावात तापमान, पावसाचे मोजमाप, हवेचा वेग आदी हवामान घटकांची नोंद घेणारे प्रगत तंत्रज्ञान पाहायला मिळाले. शेती उत्पादनावर प्रक्रिया आणि ब्रॅण्डिंग करून विक्रीचे चांगले नियोजन करण्यात आले होते. उदाहरण सांगायचे झाले तर चहाच्या मळ्यामध्ये तयार झालेल्या उत्पादनांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करून ब्रँडिंग करताना त्या ठिकाणी विद्यार्थी, पालक, पर्यटकांच्यासाठी एक संपूर्ण शेती आराखडा दाखवून त्यांच्यामध्ये शेतीची आवड कशी निर्माण करता येईल, याबाबतही सविस्तर लक्ष देण्यात आले होते.
त्यामुळे शेतीविषयी तसेच उत्पादनांच्या विषयी पर्यटकांमध्ये आपुलकी निर्माण झाल्याने शेती उत्पादनांच्या विक्रीत चांगली वाढ दिसून आली. खेडेगावात योग्य प्रजातीच्या झाडांची निवड, लागवड, पाणी व्यवस्थापन आणि त्यांचे संगोपन अभ्यासण्यासारखे आहे. पाणी देण्याची पद्धती, आकारातील एकसारखेपणा ही बाब महत्त्वाची दिसून आली. रस्त्याच्या दुतर्फा विशिष्ट प्रजातीची झाडांची लागवड करून त्यांना चारही बाजूंनी काठीचा आधार देण्यात आला होता. विविधरंगी फुलझाडांच्या कुंड्यांची रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात आले होते.
खेडेगावाच्या परिसरात शेताच्या कडेने, जंगलामध्ये वैशिष्ट्यपूर्ण बांबू जातींची लागवड पाहायला मिळते. बांबूपासून विविध उत्पादने तयार केली जातात. बांबूपासून कापड, फर्निचर निर्मिती केली जाते. याबाबत खेडेगावात प्रशिक्षण केंद्राची सोय करण्यात आली आहे. काही गावांमध्ये स्वतः शेतकरी सेंद्रिय शेतीमाल तसेच प्रक्रिया उत्पादने विक्री करताना दिसले. रताळ्याचे पापड, भात आणि बांबूपासून तयार केलेली वाइन येथील शेतकऱ्यांच्या दुकानात विक्रीस होती.
शाश्वत शहरी विकासाचे उद्दिष्ट :
निसर्गाचा समतोल राखत शहर आणि खेड्यांच्या समृद्ध विकासावर भर.
पाणी व्यवस्थापन, हरित क्षेत्र संवर्धन आणि पर्यावरणपूरक उपाय.
निसर्गस्नेही योजना :
हवामान बदल, पूर व्यवस्थापन, आणि अक्षय ऊर्जेवर(सौर, पवन ऊर्जा) आधारित आराखडा.
शहरांचे त्रिस्तरीय नियोजन, जमिनीखाली बांधकाम (मेट्रो, सांडपाणी), जमिनीवर बांधकाम (रस्ते, उद्यान), जमिनीवरील बांधकाम (पूल, उंच इमारती).
शहर, खेड्यांचा समन्वय :
जुन्या इमारतींचे नूतनीकरण करून संग्रहालय, वाचनालय आणि पर्यटक केंद्राला सुरुवात.
खेड्यांमध्ये कृषी पर्यटन केंद्राचा विकास, भातशेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग आणि शैक्षणिक सहली.
कचऱ्याचा पुनर्वापर करून पर्यावरणपूरक उत्पादनांत रूपांतर.
शाश्वत शेती आणि पर्यावरणीय पर्यटन :
हवामानावर आधारित शेती व्यवस्थापन, उत्पादन, ब्रॅण्डिंग आणि प्रक्रियायुक्त उत्पादनांची जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोच.
- डॉ. विवेक भोईटे ७७२००८९१७७
(विषय विशेषज्ञ-मृदाशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.