
Groundnut Farming Management: भुईमूग हे प्रमुख तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते. भुईमूग शेंगवर्गीय द्विदल पीक असल्याने जमिनीची सुपीकता वाढते. त्यामुळे पिकाची फेरपालट व जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळी भुईमूग पिकाची सुधारित पद्धतीने लागवड होणे गरजेचे आहे. खरीप हंगामातील भुईमुगाचे उत्पादन मुख्यत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते.
तर खरीप हंगामातील पीक कीड व रोगांना जास्त बळी पडते. त्यामुळे खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता ही जास्त असते. उन्हाळी हंगामातील उष्ण व भरपूर सूर्यप्रकाश भुईमूग पिकास चांगले मानवते. ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी तसेच फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून भुईमूग लागवड फायदेशीर ठरते.
उत्पादकता वाढीसाठी महत्त्वाच्या बाबी
लागवडीसाठी जास्त उत्पादनक्षम व कीड, रोगास प्रतिकारक सुधारित वाणांची निवड.
प्रमाणित बियाणांचा योग्य प्रमाणात वापर.
प्रति हेक्टरी रोपांची संख्या अपेक्षित राखणे.
बीजप्रक्रिया, खते, जिवाणू संवर्धक व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर.
वेळेवर तण नियंत्रण
रोग व कीड नियंत्रण.
काटेकोर सिंचन व्यवस्थापन.
आंतरमशागत
भुईमूग लागवडीनंतर ४५ दिवसांपर्यंत २ वेळा खुरपण्या करून पीक तणविरहित ठेवावे. साधारणपणे १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ कोळपण्या कराव्यात. शेवटची कोळपणी थोडी खोल करावी. त्यामुळे पिकास मातीची भर मिळते.
आऱ्या सुटू लागल्यानंतर (३५ ते ४० दिवस) आंतरमशागतीची कामे करू नयेत. फक्त मोठी तणे उपटून टाकावीत.
तणनियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर करायचा असल्यास, पेरणीनंतर दोन दिवसांच्या आत योग्य ओलीवर तणनाशक फवारणी करावी. तर पेरणीनंतर २० दिवसांनी तण उगवणीनंतर तणनाशक फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापन
उन्हाळी भुईमुगासाठी ७० ते ८० सेंमी पाणी लागते.
लागवडीसाठी प्लास्टिक आच्छादन तंत्राचा अवलंब केल्यास ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते.
पेरणीनंतर ४ ते ५ दिवसांनी आंबवणीचे पहिले पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या १० ते १२ पाळ्या द्याव्यात.
जमिनीत आऱ्या घुसण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. या काळात पिकास पाण्याचा ताण पडल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होतो.
भुईमुगासाठी तुषार सिंचन पद्धती उपयुक्त ठरते. तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होते. तसेच पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होऊन वाढीसाठी उपयुक्त ठरते.
वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पाणी व्यवस्थापन
पिकाची अवस्था पेरणीनंतर पाण्याच्या
पाळ्या (दिवस)
उगवणीच्या वेळी पेरणीनंतर लगेच
फुलोरा येणे ३० ते ४० दिवस
आऱ्या सुटण्याची अवस्था ४० ते ४५ दिवस
शेंगा धरणे व दाणे भरण्याची अवस्था ६५ ते ७० दिवस
वैशाली मिसाळ, ७७९८६०८९३२, ८७८८३६२१८७
(कृषिविद्या विभाग, आदित्य कृषी महाविद्यालय, बीड)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.