Nandurbar News : तालुक्यात पाण्याची उपलब्धता पाहता बहुतांश बागायतदार शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी व सुरू हंगामातील उसाची लागवड सुरू केली आहे. बदलते निसर्गचक्र तसेच उत्पादित मालाला खर्चाच्या तुलनेने मिळणारे कवडीमोल, मजूरटंचाई या समस्या पाहता बहुतांश शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला पसंती दिली आहे. यामुळे क्षेत्र यंदाही सुमारे सात हजार हेक्टरवर स्थिर आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कूपनलिकांच्या सहाय्याने बागायती शेती केली जाते. त्याचबरोबर केळी, पपई, ऊस, कापूस आदी पिकांसह विविध कडधान्यांचे उत्पादन घेतले जाते; परंतु गेल्या काही वर्षांपासून मजुरांची सातत्याने होणारी टंचाई तसेच मजुरीचे दर वाढल्याने उत्पादित मालाला लागणारा खर्चही वाढला आहे; परंतु त्या मानाने अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली आहे.
परिणामी उसाला काहीअंशी मजुरी कमी लागते, तसेच कीटकनाशकांची फवारणीही नसल्याने अधिकाधिक शेतकरी ऊस लागवडीस पसंती देत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे ते शेतकरी ऊस लागवडीकडे वळत आहेत. परिसरात दुर्गा खांडसरी, पुरुषोत्तमनगर येथील नागाई शुगर तसेच समशेरपूर येथील आयान मल्टी ट्रेड एलएलपी आदी कारखान्यांमध्ये परिसरातील ऊस गाळपासाठी जातो.
इतर कारखान्यांच्या तुलनेत जिल्ह्यातील कारखान्यांकडून शेतकऱ्यांना पाहिजे तसा दर मिळत नसल्याने ऊसदराविषयी शेतकऱ्यांची नाराजी कायम आहे. परंतु इतर पिकांना लागणारा खर्च, त्यासोबतच करावी लागणारी मेहनत पाहता त्यामानाने ऊस नैसर्गिक संकटातही तग धरून राहतो म्हणून बहुतांश शेतकरी ऊस लागवडीस पसंती देत आहेत.
स्थानिक कारखान्यांचा आधार
पैकी यंदा जिल्ह्यातील प्रमुख कारखान्यांत गाळप होत आहे. कारखान्यांमध्ये परिसरातील ऊस गाळपासाठी जात आहे. सुधारित जातीचे ऊस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे. पट्टा पद्धतीने लागवड करणे व कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान वापरत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.