
Pune News: राज्यातील कृषी सहायकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी काही अवधी लागू शकतो. मात्र, ऐन खरिपात कामबंद आंदोलन करू नये, अशी मनधरणी कृषी विभागाकडून केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने एकूण १५ मागण्यांसाठी गुरुवारपासून (ता.१५) बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यात पुन्हा खरीप हंगामाचे नियोजनदेखील अर्धवट राहिले आहे. त्यामुळे क्षेत्रीय पातळीवर मोलाची भूमिका बजावणाऱ्या दहा हजार कृषी सहायकांनी बेमुदत कामबंद केल्यास खरीप हंगाम नियोजनाचे तीनतेरा वाजू शकतात, अशी भीती प्रशासनाला वाटत आहे. कारण, या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य कृषी अधिकारी संघटना व महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटना अशा दोन इतर मोठ्या संघटनांनीदेखील पाठिंबा दिला आहे.
कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले की, कृषी सहायकांच्या मागण्या शासनस्तरावर पोहोचविण्यात आलेल्या आहेत. या मागण्यांबाबत कृषी विभाग सकारात्मक आहे. परंतु, मागण्यांबाबतचे मुद्दे केवळ कृषी विभागाशी संबंधित नसून त्यात नियोजन, वित्त, महसूल, ग्रामविकास अशा विविध विभागांचाही संबंध आहे. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी वेळ लागू शकतो. कृषी सहायकांनी शासन पातळीवरील अडचणी तसेच खरीप हंगामातील त्यांच्या कामकाजाची आवश्यकता लक्षात घेता एकदम आंदोलन पुकारू नये. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ शकते.
महाराष्ट्र राज्य कृषी अधिकारी संघटनेने कृषिमंत्र्यांना दिलेल्या पत्रात कृषी सहायकांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे नमुद केले आहे. संघटनेचे अध्यक्ष हितेंद्र पगार यांनी सांगितले की, कृषी सहायकांच्या मागण्या रास्त आहेत. त्या मंजूर झाल्याच पाहिजे. तसेच, सर्व संघटनांना विश्वासात घेत कृषी विभागाचा आकृतिबंध मंजूर झाला पाहिजे. तसे न झाल्यास सर्व तांत्रिक कर्मचारी व अधिकारी संघटनादेखील या आंदोलनात सक्रिय सहभागी होतील.
शासनाकडून केवळ भूलथापा
कृषी सहायकांच्या म्हणण्यानुसार, शासनासमोर आम्ही एका रात्रीत मागण्या ठेवलेल्या नसून त्यासाठी अनेक महिन्यांपासून पाठपुरावा केला जात आहे. फेब्रुवारीत स्वतः कृषिमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत दोन आठवड्यांत मागण्या मान्य करण्याबाबत आश्वासन दिले गेले होते. परंतु, शासन केवळ भूलथापा देत असून मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच नाइलाजाने बेमुदत कामबंद पुकारावे लागले आहे.
कृषी पर्यवेक्षकदेखील कामे बंद ठेवणार
महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील व सरचिटणीस विक्रांत परमार यांनी कृषी सहायकांच्या आंदोलनात उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सहायकांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास पर्यवेक्षकदेखील कामबंद आंदोलन सुरू करतील, असे पर्यवेक्षक संघटनेने स्पष्ट केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.