Soybean Market : सोयाबीनाचा बाजारभाव अन् ओलावाही वाढेना

Soybean Rate : हमीभाव खरेदी केंद्र सुरू होऊन दीड महिना उलटला तरी अडत बाजारातील सोयाबीनचा भाव वाढत नसल्याचे चित्र आहे.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Latur News : लातूर : हमीभाव खरेदी केंद्र सुरू होऊन दीड महिना उलटला तरी अडत बाजारातील सोयाबीनचा भाव वाढत नसल्याचे चित्र आहे. याबरोबरच शासनाने निर्णय घेऊन १८ दिवस झाले तरी केंद्रांवर सोयाबीनच्या ओलाव्याचा टक्का वाढत नसल्याची स्थिती आहे.

ओलावा कमी झालेल्या सोयाबीनची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना केंद्रांवर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे सोयाबीनच्या हमीभावासाठी अनेक अडचणी शेतकऱ्यांना येत असल्याने काही शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने सोयाबीनची पुन्हा साठवणूक करण्यावर भर दिला तर काही शेतकऱ्यांना भाववाढीची आशा सोडून देत सोयाबीनची विक्री सुरू ठेवली आहे.

Soybean Market
Soybean Market : सोयाबीन आयातशुल्क कमी करण्याची मागणी; बाजारभाव पडतील का?

यातूनच मंगळवारी लातूरच्या बाजारात सोयाबीनची आवक वाढून ती ३१ हजार ५७३ क्विंटलवर गेली. यंदा चांगला पाऊस झाल्याने व काढणीच्या वेळी पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीनचे चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे. मात्र, सोयाबीनच्या भावाबाबत शेतकऱ्यांना संयमाची परीक्षा द्यावी लागत आहे.

काढणीच्या वेळी बाजारात असलेला पाच हजार रुपये क्विंटलचा भाव घसरून चार हजार दोनशे रुपयांपर्यंत खाली आला तो साडेचार हजारांच्या पुढे जाण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. यातच यंदा सरकारने चार हजार ८९२ रुपये क्विंटल हमीभावाने सोयाबीनची खरेदी करण्याचा निर्णय घेत १५ ऑक्टोबरपासून केंद्रावर प्रत्यक्ष खरेदीलाही सुरुवात केली.

मात्र, सुरुवातीला बारदाना व त्यानंतर सोयाबीनमधील ओलाव्याची अडचण झाली. केंद्रावर बारा टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची खरेदी करण्याचे बंधन होते. केंद्रावरील या गोंधळाचा फायदा व्यापाऱ्यांना झाला. यामुळे बाजारात गेल्या दीड महिन्यात सोयाबीनचे भाव वाढले नाहीत. हमीभाव केंद्रावर मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी सुरू झाली असती तर बाजारात भाव वाढले असते. मात्र, सर्वच केंद्रांवर नियमांची मांदियाळी सुरू झाली.

ओलाव्यानंतर सोयाबीनमधी काडी कचरा, तसेच काही वाणांबाबत अडचण झाली. चांगल्या दर्जाच्या सोयाबीनची खरेदी करण्यावर केंद्राचा भर असल्याने मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या खरेदीला केंद्रावर नकार मिळू लागला. यातच ओलाव्याचा नियम बदलून १२ वरून १५ टक्के झाला. हा निकष बदलून १८ दिवस झाले तरी केंद्रावर बारा टक्के ओलावा धरूनच खरेदी केली जात आहे.

एकूण हमीभावासाठी नोंदणीपासून विक्रीपर्यंत शेतकऱ्यांची कसरत होत असल्याने शेतकऱ्यांनी आता हमीभावाचा नाद सोडून देत बाजारात सोयाबीनची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. यातूनच मंगळवारी बाजारात सोयाबीनची आवक वाढली. मात्र, कमाल भाव चार हजार ३९० व किमान भाव तीन हजार ९५७ होता.

सोयाबीनची पुन्हा थप्पी
शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने मागील तीन हंगामातील सोयाबीनची विक्री न करता त्याची घरी व शेतात थप्पी लावून ठेवली. मात्र, प्रत्यक्षात भाववाढ झालीच नाही. यंदाही भाववाढीसाठी शेतकऱ्यांना तोच अनुभव येत आहे. वाहतूक वअन्य खर्च पहाता हमीभावापेक्षा बाजारात सोयाबीनची विक्री करणे परवडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यातच काही शेतकऱ्यांना येत्या काळात सोयाबीनचे भाव वाढण्याची आशा लागली आहे. तातडीच्या आर्थिक गरजा नसलेल्या शेतकऱ्यांनी यामुळेच सोयाबीनची साठवणूक करण्यावर भर दिला असून पुन्हा सोयाबीनची थप्पी लावली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com