
प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला आपल्या वॉर्डमध्ये असलेली एकूण लोकसंख्या, कुटुंब संख्या, मतदारांची इत्थंभूत माहिती असते, कारण त्याशिवाय तो निवडून येऊ शकत नाही. ग्रामपंचायतीच्या क्षेत्राचे नियोजन प्रशासनासाठी वॉर्डनुसार केलेले असते.
शक्यतो यासाठी भौगोलिक सीमा असतात. त्या वार्डसाठी मतदार आपला प्रतिनिधी निवडतात. प्रत्येक वॉर्डामध्ये एक समविचारी गट तयार करणे हे त्या निवडून आलेल्या सदस्याचे प्राथमिक कर्तव्य होय.
प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याने आपल्या सोबत किमान सात जणांचा एक गट तयार करावा. समविचारी, सकारात्मक दृष्टी ठेवणारे, गावाच्या विकासामध्ये योगदान द्यावयाची मानसिकता असेल अशा लोकांचा हा गट असावा. यामध्ये युवक, युवती, बचत गटातील महिला, ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त, ग्रामस्थ यांचा समावेश असावा.
प्रत्येक सदस्य हा संबंधित वार्डाचा प्रमुख आहे असे गृहीत धरून त्यांनी त्या वार्डातील कुटुंबनिहाय माहिती एकत्र करावी. त्या कुटुंबातील नेमक्या गरजा काय आहे, समस्या काय आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे.
सात जणांच्या गटातील सर्वांची भौगोलिक पार्श्वभूमीनुसार जाणून घ्यावी. माझ्या परिचयाचे आहेत किंवा त्यांनी निवडणुकीत माझ्यासोबत काम केलेले म्हणून त्यांना गटामध्ये घेतो, यापेक्षा थोडासा व्यापक विचार ठेवणे गरजेचे आहे. वार्डातील प्रत्येक भौगोलिक क्षेत्रातून त्यांची निवड करावी. त्या प्रत्येकाकडे किमान ४० ते ५० कुटुंब आणि त्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम दिल्यास समस्येची नीट मांडणी आणि आकलन होईल.
शाश्वत विकासाच्या ध्येयानुसार नियोजन
गावातील समस्यांची नऊ शाश्वत विकासाच्या ध्येयामध्ये विगतवारी करावी. सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येवून पुन्हा बैठकीमध्ये हा अभ्यास करावा. गाव पाणीदार झाल्यास निम्मी ध्येये सुलभ होतात. सरपंचाने या सर्व अभ्यासाची एकत्रितपणे नोंद घेऊन समस्या आणि त्यांचे उपाय काय? हे कागदावर मांडून अगदी गंभीरपणे विचारविनिमय करावा. ग्रामपंचायतीच्या बैठका केवळ याच कारणासाठी घेतल्यास ते अत्यंत उपयुक्त आहे. समस्यांची एकत्रित यादी केली आणि त्यांच्या उपाययोजनांची यादी केल्यास आपल्याला पुढील पाच वर्षांत करावयाची कामाची स्पष्टता येईल.
निधी आणि विकास
केंद्र शासनाने २०१५ पासून वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निधीचा योग्य उपयोग केल्यास आपल्याला असलेल्या समस्या टप्प्याटप्प्याने दूर करता येतील याची खात्री बाळगता येते.
पंचायतीकडे येणारा निधी आणि विकासाची सांगड घालून गावाचा संतुलित विकास साधने आवश्यक आहे. जनतेच्या आणि लोकांच्या गरजांना यात अग्रस्थान असेल. त्याच प्रमाणे जनतेनेदेखील अधिक सतर्क असणे क्रम प्राप्त असेल. इंटरनेटच्या माध्यमातून सर्व माहिती अगदी सहजपणे हाताशी आहे ,संपर्काचे प्रभावी साधन हातात आहे, त्याचा उपयोग करावा.
तांत्रिक साह्य केवळ कल्पना विश्वात रमण्यापेक्षा; व्यक्तीच्या, समाजाच्या आणि निसर्गाच्या समस्यांची जाणीव स्पष्ट होते. त्यांच्या संभाव्य उपाययोजना करण्यासाठी लोकांशी चर्चा करून त्या उपाययोजना मांडणे गरजेचे आहे. अन्यथा, एकसुरीपणा येतो.
ग्रामपंचायतीची प्रशासकीय रचना
प्रत्येक ग्रामपंचायतीला एक सचिव असतो. तसेच काही कर्मचारी असतात. या सर्वांसाठी एक विशेष बैठक घेणे गरजेचे आहे. या बैठकीमध्ये ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन विश्वासाचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.
प्रत्येक वॉर्डातून जे सात स्वयंसेवक त्या सदस्याने निवडले आहेत, त्या सर्वांचे एकत्रित बैठक घेऊन ग्राम विकासाच्या सर्व कल्पना देणे आवश्यक आहे.
सरपंचांची अभ्यासू वृत्ती वाढावी लागेल. गावामध्ये असलेले अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये तलाठी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, पशुसंवर्धन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी कृषी सेवक, इत्यादी जे सर्व ग्रामस्थ आहेत त्या सर्वांची एक वेगळी बैठक घेणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीच्या किती बैठका घ्याव्यात, यासाठी कमाल मर्यादा नाही. या बैठका अतिशय चांगल्या वातावरणामध्ये घेणे गरजेचे आहे.
७३ वी घटनादुरुस्ती आणि गावाचा विकास
१९९३ सालच्या ७३ व्या घटना दुरुस्तीच्या निमित्ताने ग्रामपंचायत ीला २९ विषयांचे हस्तांतरित करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे. या विषयांची यादी खालील प्रमाणे आहे. गावाच्या समस्या या सर्व २९ विषयांमध्ये मांडता येतात. या प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र योजना, विभाग आणि कर्मचारी हे उपलब्ध असतात.
गावातील प्रत्येक व्यक्ती, कुटुंब आणि वॉर्डाची नेमकी माहिती आहे.
गावाच्या समस्या आणि त्याची यादी आपल्यासमोर आहे.
७३ व्या घटना दुरुस्ती दिलेले २९ विषय ग्रामपंचायतीसमोर आहेत, यासाठी योजना कोणत्या याची देखील माहिती आहे. या सर्वांची एकत्रितपणे व्यवस्थित मांडणी केल्यास समस्या, विषय, विभाग आणि निधी या सगळ्यांची सांगड आपल्याला व्यवस्थितपणे घालता येते.
गावाच्या समस्यांचे आकलन आणि उपाय
माझ्या गावच्या अथवा माझ्या विभागाच्या समस्या काय आहेत, त्या समस्यांना मला दूर करण्यासाठी नेमके काय करावे लागेल? याबाबत स्पष्टता असल्यास समस्या दूर करण्यासाठी योजना आणि तंत्रज्ञानाचा यथायोग्य उपयोग करून घेता येऊ शकतो.\
समस्यांचे आकलन कसे करावे?
आपण एक उदाहरण घेऊयात. एका ग्रामपंचायतीमध्ये लोकसंख्या सुमारे अडीच हजार आणि ग्रामपंचायत सदस्य सात असे असल्यास सरपंच सर्व गावाचा प्रमुख म्हणून काम करणार असेल आणि प्रत्येक वॉर्डामधून ग्रामपंचायत सदस्य निर्वाचित असेल.
संपूर्ण गावाच्या समस्या एकत्रित करण्यासाठी व्यक्तीच्या समस्या, कुटुंबाच्या समस्या, आपण राहत असतो त्या त्या वॉर्डाची समस्या यांची नेमकी आखणी करणे गरजेचे आहे.
विकासाचे आकलन
बराच वेळा असे निदर्शनास येते, की वार्डाचा विकास करणे किंवा गावाचा विकास करणे म्हणजे केवळ मूलभूत सुविधा अथवा बांधकाम बघून कामांची रेलचेल असावी, अशी बऱ्याच जणांची प्राथमिकता असल्याचे जाणवते. यासाठी मग विविध स्तरावरून मिळणाऱ्या निधीची मागणी आणि शोध सुरू होतो. या चढाओढीत नेमक्या गरजा मागे पडतात.
गावाचा विकास
गावाचा विकास म्हणजे व्यक्तीचा विकास होय. मागील लेखात चर्चा केल्याप्रमाणे नऊ संकल्पनांवर विकासाची विगतवारी करण्यात येते. या नव संकल्पनांवर काम करण्यासाठी मला नेमके काय करावे लागेल याची आपल्याकडे अद्ययावत माहिती हवी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.