Pune News : राज्यात दोन दिवसात घडलेल्या दोन बोट दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून २ जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. दरम्यान उजनी बोट दुर्घटनेतील शोधकार्य ४० तासानंतर संपले असून शेवटचा मृतदेह देखील एनडिआरएफ पथकाच्या हाथी लागला आहे. उजनी बोट दुर्घटनेतील सहावा मृतदेह गुरूवारी (ता.२३) सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान सापडला. यानंतर दोन दिवसांपासून सुरू असणारे शोकार्य थांबण्यात आले असून हा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयास पाठवण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (ता.२१) संध्याकाळी ही दुर्घटना घडली. यात बोट उलटून ६ जण बेपत्ता झाले होते. यात एकाच कुटूंबातील चार जणांसह इतर दोघांना जलसमाधी मिळाली होती. यांचा मागील ४० तासापासून एनडीआरएफच्या पथकाकडून शोध घेतला जात होता. दरम्यान ४ तासांच्या आधी पाच मृतदेह एनडीआरएफच्या पथकाच्या हाती लागले होते. तर शेवटचा मृतदेही आता मिळाला आहे.
उजनी बोट दुर्घटना
उजनी बोट दुर्घटना ही मंगळवारी सायंकाळी घडली. डोंगरे व जाधव कुटुंबीय इंदापूर तालुक्यातील अजोती येथे जागरण गोंधळ कार्यक्रमाला बोटमधून जात होते. यावेळी बोट मध्यभागी नदीपात्रात आल्यानंतर वादळी वाऱ्याने ती उलटली. यात सहा प्रवाशी बुडाले. यात सकाळी पाच आणि आणि १०.३० वाजण्याच्या सुमारास उर्वरीत एक असे सहाही मृतदेहांचा शोध एनडीआरएफच्या पथकाकडून घेण्यात आला आहे. तब्बल ४० तास येथील शोधकार्य सुरू होते.
दुर्घटनेतील मृतांची नावे
कृष्णा दत्तू जाधव (व-२८), कोमल कृष्णा जाधव (व-२५), वैभवी कृष्णा जाधव (व-२.५), समर्थ कृष्णा जाधव (व- १) सर्व राहणार झरे (ता. करमाळा, जि. सोलापूर) तर झरे येथील रहिवाशी असणारे अनुराग अवघडे (वय ३५) आणि गौरव डोंगरे (वय १६) अशी नावे आहेत. तर १६ वर्षीय गौरव डोंगरे हा आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांचा मुलगा होता.
एकाच कुटूंबातील चौघांचा करुण अंत
उजनी धरणाच्या जलाशयातील बोट दुर्घटनेत एकाच कुटूंबातील चौघांचा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यात जाधव कुटूंबातील एका वर्षाच्या बालकासह एका चिमुरडीचा समावेश आहे.
यादरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीत देखील बोट बुडाल्याची घटना गुरूवारी (ता.२३) घडली. यात SDRF च्या पथकातील तीघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांचा शोध घेतला जात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव गाव जवळील प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेली दोन युवक बुडाली. त्यांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आले होते. मात्र आज गुरूवारी सकाळी शोध मोहिमे दरम्यान पथकातील चार आणि अन्य एक बोटीत असतानाच बोट उलटली. यात तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोघांचा शोध घेतला जात आहे.
पंधरा दिवसात १८ जणांचा बुडून मृत्यू
उजनी धरणासह प्रवरा नदीत बोट बुडून तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात एसडीआरएफच्या पथकातील तीन जवानांचा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी येथील भावली धरणात देखील ५ जणांचा बुडून मृत्यू झाला. तर येथीलच मुंढेगावच्या शासकीय आश्रमशाळेच्या परिसरातील एका विहिरीत विवाहित महिलेसह मुलीचा मृतदेह आढळला होता. तसेच पुण्यातील पाबळमध्ये आजोबांसोबत शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन सख्याभावांचा बुडून मृत्यू झाला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.