
Dharashiv News : काही वर्षांत शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरलेल्या गाळ्याच्या सोन्यासाठी जिल्हा प्रशासनांनी हालचाली सुरू केल्या आहेत. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून आतापर्यंत तलावांतील गाळाचा उपसा केल्यानंतर या योजनेतून यंदा नदीनाल्यांतीलही गाळाचा उपसा करण्यात येणार आहे.
त्याची तयारी प्रशासनाने सुरू केली असून, भारतीय जैन संघटना (बीजेएस) या अभियानात जनजागृतीसह गाळ उपशासाठी येणाऱ्या अडचणी दूर करणार आहे. जिल्ह्यात यंदा एक कोटी घनमीटर गाळाचा उपसा करण्याचे नियोजन असून, त्यासाठी नदीनाले व तलावांचे सर्व्हेक्षण हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी दिली.
तलाव व प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ असून या गाळामुळे तलाव व प्रकल्पांच्या पाणीसाठवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. साठवण क्षमता कमी झाल्याने सिंचनासाठी पाणी अपुरे पडत आहे. दुसरीकडे हाच गाळ शेतात टाकल्यानंतर जमिनी सुपीक होऊन पिकांचे उत्पादन वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून गाळाचा उपसा करून तो जमिनीवर टाकण्यासाठी स्पर्धा आहे.
सरकारने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना गाळ उपशासाठी आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे. यात दिव्यांग व महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. काही वर्षात शेतकऱ्यांनी या योजनेतून गाळाचा उपसा करून जमिनी सुपीक केल्या आहेत. भांडवलदार शेतकरी स्वखर्चाने गाळाचा उपसा करत असून गेल्या वर्षी तर गाळाला सोन्याचा भाव आहे.
तलाव परिसरातील शेतकऱ्यांनी गाळावर हक्क सांगत पाचशे ते सातशे रुपये ब्रासने त्याची विक्री केली. या गाळासाठी शेतकऱ्यांचा आगळीक लक्षात घेतात जिल्हा प्रशासनाने आतापासूनच योजनेची तयारी सुरु केली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील २६९ तलावांतून एक कोटी दहा लाख घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला.
यंदा एक कोटी घनमीटर गाळ उपशाचे उद्दिष्ट असून, त्यासाठी बीजेएसच्या माध्यमातून तलावांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. लवकरच गाळ उपशाची ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत. यंदा तलावांसोबत नदीतील गाळ जलसंपदा तर नाल्यांतील गाळ जलसंधारण विभागाच्या पुढाकाराने काढण्यात येणार असल्याची माहिती श्री. महामुनी यांनी दिली.
धाराशिवला आघाडीवर ठेवणार
भारतीय जैन संघटना गाळ उपशासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचे काम करणार आहे. गाळ उपशासोबत नाला सरळीकरण व खोलीकरणाची कामेही हाती घेण्यात येणार आहे. यासाठी संघटनेच्या वतीने सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. तालुकानिहाय समन्वयकांची नियुक्ती केली आहे. सरपंच व ग्रामसेवकांच्या माध्यमातून त्याच्या कार्यक्षेत्रातील कामाचे स्वरूप निश्चित करण्यात येणार आहे.
या कामासाठी संघटनेकडून जेसीबी मशिन व डिझेलचा निधी जिल्हा प्रशासनाला देणार आहे. प्रशासनाकडूनच ही कामे केली जाणार असून, संघटनेकडून कामातील अडचणी दूर करण्यासोबतच गरजू शेतकऱ्यांना गाळ नेण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. मोहिमेत गेल्या वर्षी धाराशिव जिल्हा राज्यात आघाडीवर होता. यंदाही जिल्ह्याला आघाडीवर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संघटनेच्या जिल्हा समन्वयक कांचनमाला संगवे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.