
Solapur News : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेत शेवटच्या दिवशी होणाऱ्या होमप्रदीपन आणि भाकणुकीला महत्त्व असते, यंदाच्या या भाकणुकीत पिकांसह पाऊसपाणी मुबलक राहील. तसेच सर्वत्र शांती आणि सुखा-समाधानाचे वातावरण असेल, अशी भाकणूक करण्यात आली.
भाकणुकीसाठी गाईच्या वासराला वतनदार देशमुख यांच्या घरात दिवसभर उपाशी ठेवले जाते आणि मध्यरात्री होम मैदानावर होमविधी पार पडल्यानंतर डॉ. फडकुले सभागृहाशेजारी या वासराला आणले जाते.
तिथे मानकरी हिरेहब्बू आणि वतनदार देशमुख या वासराच्या हालचालींवरून भाकणूक करतात. पहिल्यांदा वासरांची पूजा केली जाते. त्यानंतर त्याच्यासमोर गाजर, पेरू, गूळ, ऊस, धान्य, बोर, विड्याची पाने आदी साहित्य ठेवले जाते.
यंदा या वासराने सुरुवातीला न खाता गाजर आणि बोराला केवळ स्पर्श केला. त्याशिवाय मल, मूत्रही विसर्जन केले नाही. वासरू आरती करताना घाबरले नाही, शांतपणे हिरेहब्बू यांच्या हातातील योगदंडाजवळ आणि सगळ्यांजवळ गेले.
डोक्यावर अक्षता टाकतानाही ते शांत राहिले. या सर्वांचा अर्थ सांगताना राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले, की वासराने मलमूत्र विसर्जन केले नाही, याचा अर्थ आगामी वर्षभरात पीकपाण्यासह पाऊस मुबलक राहणार आहे.
गाजराला स्पर्श केला, ते खाल्ले नाही, याचा अर्थ महागाई स्थिर राहील, एवढ्या सर्व कालावधीत वासरू अगदी शांत राहिले, कुठेही गडबड-गोंधळ नाही, याचा अर्थ पुढे शांती, सुख-समाधानाचे वातावरण राहील, असे त्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.