Pune News : जिल्ह्यातील आदिवासी बहूल़, शेतीसंपन्न आणि औद्योगिक नगरी असा लौकिक असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात पाच वर्षांनंतरही शेती, बेरोजगारी, महामार्गावरील वाहतूक कोंडी हे प्रश्न कायम आहेत. पुन्हा याच प्रश्नांवर २०१९ मधील तेच उमेदवार निवडणूक लढत आहेत.
शिवसेना फुटीनंतर शिंदे गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) मध्ये दाखल झालेले महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) डॉ. अमोल कोल्हे अशी दुरंगी लढत पुन्हा रंगली आहे.
२०१९ च्या लढतीत डॉ. कोल्हे यांनी शिवसेनेच्या आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. अभिनय क्षेत्राला रामराम करून पूर्णवेळ राजकीय क्षेत्रात करिअर करण्याची घोषणा डॉ. कोल्हे यांनी केली. मात्र ‘कोल्हे हे मालिका विश्वातच रममाण झाले. यामुळे त्यांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष्य झाले’, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
तसेच कोरोना संकटात देखील स्वतः डॉक्टर असताना त्यांनी मतदारसंघ वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. हाच मुद्दा सध्या प्रचारात महत्त्वाचा ठरत आहे. तर ‘मी सातत्याने कांदा निर्यातबंदी, दूध, सोयाबीनचे पडलेले दर, बिबट्या समस्येवर संसदेत केंद्र सरकारला जाब विचारला,’ असे डॉ. कोल्हे ठणकावून सांगत आहेत.
मी सुचविलेल्या आणि केलेल्या कामांच्या उद्घटनांची नारळ फक्त कोल्हे फोडत असून, माझ्या अपूर्ण कामांचा पाठपुरावा देखील कोल्हे यांनी केला नसल्याचा आरोप आढळराव पाटील यांनी केला आहे. यामुळे अपूर्ण कामांसाठी केंद्र सरकारकडून किमान ५० हजार कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. श्री. मोदी यांच्या विचाराचा खासदार संसदेत पाहिजे, यासाठी मला विजयी करावे, असे आवाहन आढळराव करत आहेत.
या मतदारसंघात जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर हे ग्रामीण आणि शेतीबहुल मतदारसंघाचा तर हडपसर आणि भोसरी या शहरी आणि औद्योगिक नगरी असलेल्या मतदारसंघाचा समावेश आहे.
आढळराव यांच्याविषयी थोडक्यात
जमेच्या बाजू
- २०१९ ला पराभूत होऊन सुद्धा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क
- पराभूत होऊन सुद्धा राज्य सरकारकडून १९ हजार कोटींची विकास कामे केल्याचा दावा
- महायुतीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ५ आमदार सोबत असल्याचा फायदा
- एकेकाळचे विरोधी असणारे मंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांची खंबीर साथ
नकारात्मक बाजू
- शिवसेना ठाकरे गट, नंतर शिंदे गटातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेशामुळे गद्दारीचा आरोप
- शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या अभ्यासाचा अभाव
- पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे बाबत साशंकता
डॉ. कोल्हे यांच्याविषयी थोडक्यात
जमेच्या बाजू
- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याचा फायदा
- १७ हजार कोटींची विकास कामे केल्याचा दावा
- अभिनेत्याचा चेहरा, फर्डा वक्ता
- शिवसेना ठाकरे गटाची साथ.
नकारात्मक बाजू
- विद्यमान खासदार असून सुद्धा मतदारसंघात जनसंपर्काचा अभाव
- नुसतीच भाषणे केली पण एकही प्रकल्प मार्गी न लागल्याचा आरोप
- पक्षीय सोडून स्वतःची प्रचार फळी नसल्याचा तोटा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.