
Mumbai News: ‘‘राज्यातील जमिनी परराज्यातील व्यक्तींना केवळ विकल्या जात नाहीत, तर त्यात भागीदारी घेतली जात आहे. या गोष्टी आपण थांबवल्या नाहीत तर अमराठी लोकप्रतिनिधी आपल्या डोक्यावर बसतील. त्यामुळे यापुढे जमिनी विकत घेणार आणि वाटेल तसे थैमान घालणार असाल, तर हे चालू देणार नाही,’’ असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठणकावले.
तसेच ‘‘याला सरकार जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून सुरक्षा देणार असेल आणि विरोध करणाऱ्यांना अटक करणार असेल तर अटक करून पाहा,’’ असे आव्हानही त्यांनी दिले. पनवेल येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर टीका केली.
श्री. ठाकरे म्हणाले, की देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही गुजरातचे आहेत. गृहमंत्री अमित शहा हे आपण हिंदी भाषिक नव्हे तर गुजराती आहोत असे सांगत असतील तर आम्हाला संकुचित का ठरवले जात आहे? आज राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला जात आहेत. तेथील शेतजमीन भारतातील कुठलाही नागरिक विकत घेऊ शकत नाही. कायद्यानुसार परवानगी घेतल्यानंतरच व्यवहार होतो. मग आज आपल्याकडे जमिनी कोण विकत घेते, हे एकदा पाहा. आपलेच लोक जमिनी विकत आहेत. यातून आपण संपून जाऊ. एकदा जमीन गेली की जगाच्या पाठीवर कुठेही स्थान नाही, हे लक्षात घ्या, असा इशाराही त्यांनी दिला.
‘इथे येणाऱ्यांना मराठी शिकवा’
राज्य सरकारचे लक्ष नसले की प्रदेश बरबाद व्हायला वेळ लागत नाही, अशी टीका करत राज ठाकरे म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथल्या लहान मुलांना हिंदी शिकवण्याचा हट्ट धरून बसले आहेत. मात्र महाराष्ट्रात कामधंदा करायला येणाऱ्यांना मराठी कसे येईल याचा विचार करत नाहीत. महाराष्ट्रातील भूमिपुत्र माणसाचा सरकारला विचार नाही. याचे भीषण वास्तव रायगड जिल्ह्यात आहे. रायगडातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी विकल्या जात आहेत. जमिनीचे व्यवहार करणारे आपलेच लोक आहेत. इथे उद्योग उभारले जात आहेत आणि कामगारही बाहेरील आणले जात आहेत. त्यामुळे शेतकरी आणि कामगार उद्ध्वस्त होत आहेत. यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पुढे आले पाहिजे.
‘रायगड जिल्ह्यात सर्वाधिक डान्स बार कसे?’
रायगड जिल्ह्यात सर्वाधिक डान्स बार आहेत. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा-नारळाने ओटी भरून आईचा दर्जा देणाऱ्या शिवरायांच्या भूमीत हे चाळे सुरू असल्याची टीका ठाकरे यांनी केली.
‘भांडणासाठी गुजराती साहित्य संमेलन’
‘‘राज्य सरकार गुजराती साहित्य संमेलन भरवत आहे. हे गुजराती माणसाबद्दल प्रेम नाही तर भांडणे लावण्याचा उद्योग आहे. तुम्हाला हवे ते करा पण ज्या वेळी महाराष्ट्राला नख लागेल, तेव्हा आम्ही अंगावर येऊ,’’ असा इशाराही त्यांनी दिला. ‘‘कान, डोळे बंद ठेवू नका. आजूबाजूला काय होत आहे, याकडे लक्ष द्या. तुम्ही विकले जात आहात. तुमच्या पायाखालची जमीन निसटत आहे. तुम्ही श्रीमंत व्हा पण जमिनी विकून नव्हे,’’ असेही राज ठाकरे यांनी आवाहन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.