
Nagpur News : समाज कल्याण विभागामार्फत महिला बचत गटांना पुरवण्यात आलेल्या कृषी अवजारे योजनेच्या घोटाळ्याची चौकशी सुरू करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यातील बचत गटांची माहिती घेण्यात येत आहे. काही बचत गटांना योजनेची माहितीच नसून त्यांना भरावयाची १० टक्के रक्कम त्रयस्थ व्यक्तीकडून भरण्यात आल्याची बाब तपासात समोर आल्याचे सूत्रांकडून समजते.
समाज कल्याण विभागामार्फत वर्ष २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील १०० महिला बचत गटांना कृषी अवजारे देण्याची योजना आखण्यात आली होती. यासाठी खनिज प्रतिष्ठानमधून ८ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर झाला. प्रत्येक महिला बचत गटाला ८ लाख ७१ हजारांचे साहित्य देण्यात येणार होते.
हे साहित्य ९० टक्के अनुदानावर देण्यात आले असून १० टक्के रक्कम लाभार्थी बचत गटांना द्यायची होती. उमरेड तालुक्यातील महिला बचत गटांना साहित्य मिळालेच नाही. याबाबतची तक्रार महिला बचत गटाने केल्याने समाज कल्याण विभागाने चौकशी सुरू केली.
आता या चौकशीची व्याप्ती विभागाकडून वाढवण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यातील लाभ घेतलेल्या बचत गटांची तपासणी करण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत जवळपास ६५ ते ७० बचत गटांची चौकशी करण्यात आली.
अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात आल्यानंतर ती लगेच काढण्यात आली. पुरवठादाराकडून काही साहित्य बचत गटांना देण्यात आले. परंतु ते नादुरुस्त असल्याचे कारण पुढे करीत परत नेले.
काही महिला बचत गटांचे प्रमाणपत्रही संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यामुळे त्याची तपासणी करण्यात येणार आहे. काही महिला बचत गटांना या योजनेची माहितीच नाही. त्यांना भरावयाची रक्कमही त्रयस्थ व्यक्तीने भरली व अनुदानाची रक्कम लाटल्याची बाब चौकशीत समोर आल्याचे समजते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.