
Soybean Crop Protection : राजीव घावडे, डॉ. सतीश निचळ, मंगेश दांडगे
सोयाबीन हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पीक बनले आहे. या पिकामध्ये विविध बुरशी, जिवाणू, विषाणू व सूत्रकृमींमुळे काही रोग येतात. वातावरणातील बदलांमुळेही काही रोगांचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येते. रोगाचा प्रसार मुख्यतः जमिनीद्वारे, बियाण्याद्वारे, हवेद्वारे आणि कीटकांद्वारे होत असतो. कोणत्याही पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याचे निर्मूलन करणे अवघड व खर्चिक बाब ठरते. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भावच होणार नाही, अशा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याची गरज असते.
या तुलना आपण माणसांमध्ये केल्या जाणाऱ्या लसीकरणाशी करू शकतो. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये बीज प्रक्रिया सर्वांत महत्त्वाची गोष्ट ठरते. बीज प्रक्रिया ही रोग नियंत्रणाची साधी सोपी, कमी खर्चाची आणि परिणामकारक पद्धत आहे. केवळ बीजप्रक्रिया केल्यामुळे उत्पादनात ८ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ होत असल्याचे प्रयोगात आढळले आहे. बीजप्रक्रिया न करता पेरणी केल्यास बियाण्याची उगवण बरोबर होत नाही. उगवण झाली तरी शेतामध्ये रोगग्रस्त झाडांचे प्रमाण अधिक राहून नियंत्रणावरील खर्चात वाढ होते.
पेरणीनंतर सुरुवातीला १ महिन्याच्या कालावधीत रोपावस्थेत जास्त पाऊस व शेतामध्ये पाणी साचल्यामुळे खोडकुज व मूळकुज या प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्याचप्रमाणे शेंगा अपरिपक्व अवस्थेत असताना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या कालावधीमध्ये जास्त पाऊस व शेतामध्ये पाणी साचते किंवा २० ते ३० दिवसांचा प्रदीर्घ पावसाचा खंड व प्रखर उष्णतामान यामुळेही या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. खोडमाशी, तिन्ही प्रकारचे विषाणूजन्य रोग आणि खोडकुज, मूळकुज या रोगांच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे.
कळी करपा किंवा नेक्रोसिस
या रोगाचे स्वाभाविक लक्षण म्हणजे झाडाचा शेंडा तपकिरी रंगाचा होऊन खालच्या बाजूने झुकून गुंडाळल्यासारखी हूक निर्माण होतो. यास ‘कळी करपा’ या नावाने संबोधतात. झाडाची वाढ खुंटते आणि करपलेली दिसतात, पानाची देठे काळी पडतात, शेंगधारणा होत नाही किंवा कमी होते, शेंगांत दाणे विकसित होत नाहीत. फुलकिडीद्वारे या रोगाच्या विषाणूचा प्रसार होतो. एकदा प्रादुर्भाव झाल्यानंतर रोग नियंत्रण अवघड होते.
कॉलर रॉट
या रोगामुळे सोयाबीनची रोपे कोलमडून जमिनीवर पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या झाडांना झाल्यास, झाडाचे मूळ व खोड यांच्या जोडाजवळ बुरशीची पांढरी वाढ झालेली आढळते. बुरशी बीजेही आढळून येतात. पुढे झाडाच्या या भागाची सड होते. झाड सुकते व मरून जाते. मात्र मोठ्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास झाड पिवळे पडते व नंतर मरते. या रोगामुळे उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट येते.
मूळ व खोडसड (चारकोल सड/कोळशाची सड)
पीक रोप अवस्थेत असताना या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. प्रादुर्भाव जमिनीलगतच्या खोडावर व मुळावर भुरकट काळपट डागांनी होते. खोडाची व मुळाची साल रोगग्रस्त झाल्यामुळे रोपांना अन्नपुरवठा होत नाही. पाने पिवळे पडून गळतात. अशी रोपे मरतात आणि जमिनी लगतच कोलमडतात. रोगग्रस्ट झाडावर आणि मुळावर असंख्य काळी बुरशी बीजे मायक्रोस्लेरोशिया दिसून येतात. जमिनीत कमी ओलावा आणि जमिनीचे तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस हे रोगांच्या प्रसारास पोषक ठरते. रोगग्रस्त झाडे कमजोर होतात. अकाली मरतात, मूळ व खोडसड रॉट रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात ७७ टक्क्यांपर्यंत घट येते.
खोडमाशी
सोयाबीनवर आढळणाऱ्या सर्व किडींमध्ये खोडमाशी ही महत्त्वाची कीड आहे. ती पिकाच्या १० ते १५ दिवसांच्या रोपावस्थेपासून ते कापणीपर्यंत सर्व काळात आढळून येते. प्रौढ मादी माशी २ मि.मी. लांब असून, ती काळी चकचकीत असते. ती पानाच्या पेशीमध्ये ८० ते ८५ अंडी टाकते. अंड्यातून २ ते ७ दिवसांत अंडी बाहेर पडून पानाच्या शिरेमधून देठामध्ये व नंतर देठांमधून मुख्य फांदीत व खोडामध्ये शिरते.
आतील भाग पोखरून पोकळ करत असल्याने नागमोडी पोकळी तयार होते. फांदी व खोडामध्ये प्रत्येक पिढीमध्ये साधारणपणे २० ते २५ दिवसाच्या कालावधीत अळी व कोष आढळून येतात. कोषात जाण्यापूर्वी अळी जमिनीलगत किंवा वरच्या भागात वरच्या खोडाला किंवा फांदीला माशीला बाहेर पडण्याकरता छिद्र तयार करते. या किडीची एक पिढी ३२ ते ५७ दिवसांत तयार होते.
या किडीच्या खरीप हंगामात पिकात अनेक पिढ्या तयार होतात. यामुळे पूर्वी झालेल्या काही अभ्यासात खोडमाशीमुळे १६ ते ३० टक्के नुकसान होत असल्याचे उल्लेख असले, तरी अमरावती येथील प्रादेशिक संशोधन केंद्रामध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनात ही कीड सोयाबीन पिकाचे ३० ते ६० टक्केपर्यंत नुकसान करत असल्याचे आढळले आहे.
सुरुवातीच्या रोपावस्थेत म्हणजे सुमारे एक महिन्यांच्या कालावधीमध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाचे शेंडे झुकतात. पाने पिवळी पडून सुकतात व शेवटी मरतात.
खोडमाशीच्या एक महिन्यानंतर झालेल्या प्रादुर्भावामुळे झाडे सहसा मरत नाही. परंतु शेंगा धरण्याचे प्रमाण कमी होते. दाण्याचा आकार लहान राहून उत्पादनात घट येते.
बीजप्रक्रियेचे महत्त्व
पेरणीपूर्व प्रतिबंधात्मक बीजप्रक्रियेमुळे पुढील प्रकारे फायदे होतात.
पिकावरील मर मूळकुज अशा जमिनीत वास्तव्यास असणाऱ्या रोगकारक बुरशींचे नियंत्रण बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून करता येते.
कीटकनाशकाची बीजप्रक्रिया केल्यामुळे रस शोषक किडी, खोडमाशी व अन्य किडीपासून, पीक किमान एक महिन्यापर्यंत सुरक्षित राहते.
जिवाणू संवर्धन खताची बीजप्रक्रिया केल्यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ होते. जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढते व रासायनिक खताची बचत होते.
केवळ बीजप्रक्रियेमुळे खोडामाशीसह मूळकुज,मर, कॉलर रॉट, हिरवा व पिवळा मोझॅक आणि कळी करपा या रोगापासून सरासरी ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत सोयाबीन पिकाचे संरक्षण होते.
बीजप्रक्रिया
वर सर्व रोग व किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेतच प्रतिबंध करण्यासाठी बीजप्रक्रिया हा सर्वोत्तम उपाय ठरतो. सोयाबीन बियांवर प्रक्रिया करताना प्रथम रासायनिक बुरशीनाशक, नंतर कीटकनाशक आणि शेवटी जैविक घटक बियांवर चोळावेत.
भुकटी स्वरूपात असलेले रासायनिक बुरशीनाशक कार्बोक्सिन (३७.५ टक्के) अधिक थायरम (३७.५ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम अधिक कीटकनाशक थायामेथोक्झाम (३० टक्के एफएस) १० मि.लि. प्रति किलो बियाणे.
किंवा द्रव स्वरूपातील संयुक्त बुरशीनाशक थाओफिनेट मिथिल (४५ टक्के एफ.एस.) अधिक पायरॅक्लोस्ट्रॉबीन (५ टक्के एफ.एस.) २० मि.लि.
किंवा द्रव स्वरूपातील संयुक्त बुरशीनाशक पेनफ्लूफेन (१३.१८ टक्के) अधिक ट्रायफ्लोक्सिस्ट्रॉबिन १३.२८ टक्के)- १० मिलि
किंवा द्रव स्वरूपातील संयुक्त बुरशीनाशक अधिक कीडनाशक अझोक्सिस्ट्रॉबिन (२.५ टक्के) अधिक थायोफिनेट मिथाइल(११.२५ टक्के) अधिक थायामेथोक्झाम (२५ टक्के एफएस) ४० मि.लि. बुरशीनाशकानंतर कीटकनाशकाची प्रक्रिया करून घ्यावी. (सर्व लेबलक्लेम प्राप्त.)
पेरणीपूर्वी सोयीनुसार १० ते १५ दिवस अगोदर ही प्रक्रिया करावी. त्यामुळे बीज प्रक्रिया करण्याकरिता पुरेसा अवधी मिळेल. पेरणीवेळी धावपळ होणार नाही.
पेरणीच्या दिवशी फक्त जैविक बुरशीनाशकाने (ट्रायकोडर्मा) बीजप्रक्रिया करावी. (प्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया केली असल्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया करण्याची गरज नसते. पण केली तरी हरकत नाही.)
ट्रायकोडर्मा भुकटी स्वरूपात असल्यास ४ ग्रॅम प्रति किलो किंवा द्रवरूप बुरशीनाशकाची १० मि.लि. प्रति किलो अधिक ब्राडीरायझोबिअम जापोनिकम या जिवाणू संवर्धनाची २५ ग्रॅम अधिक पीएसबी जिवाणू संवर्धन २५ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया केल्यानंतर २४ तासांचे आत पेरणी करणे गरजेचे आहे.
बीजप्रक्रियेचा क्रम लक्षात ठेवावा. FIR (F-बुरशीनाशक, I-कीटकनाशक, R-राझोबिअम (जैविक घटक)
- राजीव घावडे, ९४२०८४१४२१
(सोयाबीन रोग शास्त्रज्ञ, प्रादेशिक संशोधन केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अमरावती)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.