
Satara News : कृषी विभागाकडून पेरणीसाठी बळीराजाला हातभार लावण्यासाठी दर वर्षी अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. त्याद्वारे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागतो. मात्र यंदा कृषी विभागाने ज्यांना बियाणे पाहिजे आहे त्यांनी ऑनलाइन नोंदणी करण्याची सक्ती केली आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठीचा सर्व्हर गेल्या चार दिवसांपासून सातत्याने बंद पडत आहे.
नोंदणीसाठी केवळ सहाच दिवस राहिल्यामुळे ऑनलाइन नोंदणीसाठी महा- ई सेवा केंद्रात शेतकरी हेलपाटे मारून थकले आहेत. यंदाच्या खरिपात पेरणीसाठी बियाणे मिळणार की नाही, या चिंतेने बळीराजा हवालदील झाला आहे.
जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीन, बाजरी, भात, भुईमूग, मका, ज्वारी, मूग, नाचणी, तूर, उडीद, इतर कडधान्य आणि ऊसासह अन्य पालेभाज्या, भाजीपाल्याची पिके खरिपात मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्याद्वारे शेतकऱ्यांना चांगले पैसेही मिळतात. त्यामुळे शेतकरी ही पिके दर वर्षी घेतात. दर वर्षी शेतकरी मे महिन्याच्या १५ तारखेनंतर शेतीच्या मशागतीस सुरुवात करून शेतजमिनी पेरणीसाठी तयार करून खरिपातील पेरणीच्या तयारीला लागतात.
दर वर्षी खरिपातील पेरणीसाठी दरवर्षी शेतकरी पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पहात असतात. यंदा मात्र त्याउलट स्थिती मे महिन्याच्या मध्यावरच झाली आहे. पावसाच्या उघडिपीवर अनेक ठिकाणी शेतीच्या मशागतीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत. पाऊस कधी येईल याचा भरवसा नसल्याने शेतकरी मिळेल त्या साधनांनी मशागती करण्यात व्यग्र असल्याचे चित्र शिवारात दिसत आहे.
कृषी विभागाकडून दर वर्षी शेतकऱ्यांना अनुदानावर पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. यंदाही १०० टक्के अनुदानावर सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, भात आदी पिकांचे बियाणे शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून देण्यात येणार आहे. यंदा कृषी विभागाने मागीलसारखे थेट कृषी विभागात बियाणासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया बंद करून ऑनलाइन कार्यवाही सुरू केली आहे.
त्याद्वारे ऑनलाइन अर्ज केल्यानंतरच आता बियाणे उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वाडी-वस्तीवरील आणि खेडेगावातील शेतकरी बियाणांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी जवळच्या महा ई-सेवा केंद्रावर जात आहेत. मात्र त्या योजनेसाठी अर्ज करण्याचा सर्व्हर सातत्याने बंद पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज अपलोड होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणांसाठी अर्ज करण्यासाठी हेलपाटे मारायची वेळ आली आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
कृषी विभागाकडून यंदा शेतकऱ्यांना अनुदानावर सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, भात आदी पिकांचे बियाणे देण्यात येणार आहे. त्यासाठी पूर्वीसारखे लॉटरी पद्धतीने आता बियाणे मिळणार नाही तर ते बियाणे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नियमानुसार देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी पहिल्यांदा नोंदणी कशी होईल, यासाठी ते धडपडत आहेत. नोंदणीसाठी १५ जुनपर्यंतच मुदत असल्यानेही शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे
असे मिळेल बियाणांना अनुदान
१०० टक्के अनुदान
तीन हजार क्विंटल-भुईमुग
साडेसातशे क्विंटल सोयाबीन
५० टक्के अनुदानावर
तूर, मूग, उडीद, मका, बाजरी आदी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.