
Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, त्याचा परिणाम हापूसवर होऊ लागलेला आहे. उन्हाच्या बाजूची फळे भाजून गेली असून, त्यावर चट्टे पडू लागले आहेत. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यात सलग तीन दिवस तापमान ३६ अंशांपेक्षा अधिक राहिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक प्रचंड त्रस्त झालेले आहेत.
गेल्या १५ ते २० दिवसांपूर्वीपासून सकाळचे वातावरण थंड होते. सकाळी अकरा वाजल्यानंतर उष्ण आणि रात्री पुन्हा थंड वातावरण अशी स्थिती आहे. १४ फेब्रुवारी रोजी कमाल तापमान ३७.६ अंश सेल्सिअस होते. तर दापोलीत त्याच दिवशी ३६ अंशांवर पारा होता. त्यानंतर सहा दिवसांनी २१ रोजी पारा ३८.७ अंशावर गेला होता.
त्यानंतर सलग तीन दिवस कमाल तापमान ३६ अंशांच्या दरम्यान राहिले आहे. किमान तापमान १९ अंश सेल्सिअस इतके आहे. वातावरणातील बदलामुळे आंबा पीक या वर्षीही संकटात सापडलेले आहे. यंदा २५ ते ३० टक्केच उत्पादन राहील असा अंदाज वर्तविला जात आहे. गतवर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई तसेच स्थानिक बाजारपेठेत आंबा पेटी विक्रीला दाखल झालेली होती. या वर्षी फेब्रुवारीत आंबा आला, परंतु प्रमाण अत्यल्प आहे.
मुंबई बाजारपेठेत रत्नागिरी जिल्ह्यापेक्षा सिंधुदुर्गातील देवगड हापूसचे वर्चस्व आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अपेक्षित फळधारणा झाली नाही. पावसाळा लांबल्याने डिसेंबरपासून थंडी सुरू झाली. याच कालावधीत मणिपूरला झालेल्या वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे झाडांना पालवी आली होती. मोहर येण्याची प्रक्रियाही लांबली. अनेक झाडांवर पालवी आणि मोहर अशी संमिश्र स्थिती होती.
त्यानंतर जानेवारी महिन्यातील थंडीने जून झालेल्या झाडांना मोहर आला. परंतु त्यामधून अपेक्षित फळधारणा झालेली नाही. पहिल्या टप्प्यातील आंबा लवकर परिपक्व होणार आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांत उष्मा वाढल्यामुळे त्यापासून कैरी वाचविण्यासाठी बागायतदारांची कसरत सुरू झालेली आहे. प्रखर उन्हामुळे आंबा भाजून त्यावर चट्टे पडणार आहेत. चट्टे पडलेली फळं चार दिवसांनी गळून जातात.
हे मोठ्या प्रमाणात झाले तर त्याचा उत्पादनावर परिणाम होईल. याबाबत बागायतदार राजन कदम म्हणाले, उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. वाढत्या तापमानात छोटी फळे टिकू शकणार नाहीत, गळ सुरू झालेली आहे. ती वाढली तर उत्पादनावर परिणाम होईल. या वर्षी फेब्रुवारीत मोहर नसल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा कमी राहील. कॅनिंगसाठी आंबा कमी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
दोन दिवस उष्मा राहणार
दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागामार्फत मिळालेल्या सूचनेनुसार २६ तारखेपर्यंत रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेची स्थिती राहील, असे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आंबा, काजू, नारळ आणि सुपारी बागांना ताण बसण्याची शक्यता आहे.
त्यामुळे संध्याकाळी किंवा अगदी सकाळच्या वेळेत फळबागांना गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी. नवीन फळबाग लागवडीतील रोपांचे कडक उन्हापासून संरक्षण करण्याकरिता रोपांच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावावी. फळबाग लागवडीमध्ये जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी झाडाच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे, असे पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.