
Beed Santosh Deshmukh murder case : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य तीन आरोपींना तातडीने अटक करा. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शनिवारी (ता.२८) सकाळी १० वाजता बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला.
बीडमधील सर्वपक्षीय मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील मोर्चामध्ये सहभागी झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती संभाजीराजे, मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे, यांच्यासह अनेकांनी या मोर्चात सहभाग नोंदवला. या मूक मोर्चामध्ये 'आका'ला अटक करून फाशी द्या. अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. संतोष देशमुख यांचे कुटुंबिय या आंदोलनात सहभागी झाले होते.
काळे कपडे व काळ्या फिती लावून या मोर्चात हजारो आंदोलक सामील झाले होते. मूक मोर्चाच्या निमित्ताने शनिवार (ता.२८) सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बीड शहरातील चार प्रमुख मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. मोर्चातील हालचालीवर दोन ड्रोनची नजर ठेवण्यात आली. तसेच ७४ पोलीस अधिकाऱ्यांसह ३५० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी हजर होते. वाल्मीक कराडला अटक का नाही? असा सवाल बीडमधील मूक मोर्चात उपस्थित करण्यात आला. तसेच धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
मनोज जरांगेंची सरकारवर टीका
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मोर्चात सहभागी झाले होते, यावेळी जरांगेंनी सरकारवर सडकून टीका केली. "फडणवीसांनी मुंडेंना धोस दिली तर आरोपी सकाळपर्यंत हजर होईल. मुख्यमंत्र्यांनी आरोपींना पाठिशी घालू नये. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मुख्यमंत्री-गृहमंत्री यांनी यात हजगर्जीपणा करू नका. तुमच्या सत्तेत ते लोकं आहेत, तुम्ही कुणाचा मुलायजा ठेवू नका. मुख्यमंत्र्यांनी जातीयवाद पसरेल असे काही करु नये. जातीयवाद नष्ट करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. लोकं गुंडगिरी करत जमीनी हडपत पोलिसांना अरेरावी करत शिव्या देऊ लागले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे काम आहे. तुम्ही यांना संभाळू नका, नाही तर तुमच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ येईल", अशी टीका जरांगे पाटील यांनी केली आहे.
बच्चू कडू यांचे एकदिवसीय ठिय्या आंदोलन
तसेच माजी आमदार बच्चू कडू यांनी मस्साजोग येथील माजी सरपंच स्व. संतोष देशमुख आणि परभणीमधील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले. अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात कडू यांनी आंदोलन सुरू केले.
शिवराज्य अभिषेक सोहळा समितीच्या वतीने निषेध
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा धाराशिव मध्ये छञपती शिवाजी महाराज चौकात शिवराज्य अभिषेक सोहळा समितीच्या वतीने निषेध करण्यात आलाय.यावेळी देशमुख यांच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा व्हावी अशा घोषणा देत हाताला काळी फीत बांधून शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.