शिवाजीराव देशमुख सल्लागार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट
Sakal Media Group : ‘सकाळ माध्यम समूहा’ने केवळ शेतकऱ्यांसाठी संकल्पपूर्वक एक दैनिक काढले. सुदैवाने पहिल्या अंकाच्या प्रकाशन सोहळ्याचा मी साक्षीदार आहे. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. मला एक गोष्ट इथे प्रामाणिकपणे सांगावीशी वाटते, की शेतकऱ्यांसाठी दैनिक खरोखर तगून राहील याविषयी कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवरांना शंका होती आणि त्यापैकीच मी एक होतो.
राज्यभर तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत हे दैनिक पोहोचेल का, अशी शंका होती. त्या वेळी दूरदर्शनवरील शेतीविषयक कार्यक्रम आघाडीवर होते. एक एक विषय, पीक घेऊन दूरदर्शनवर चांगले कार्यक्रम सादर होत असत व ते लोकप्रिय होते. त्यामुळे विकत घेऊन कोणी वर्तमानपत्र रोज वाचेल का, अशी शंका सुरुवातीला कायम होती. सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि मी अनेकदा याविषयावर चर्चा करीत असू.
मी तेव्हा प्रतापरावांना म्हणालो, की हा कृषी दैनिकाचा व्यवसाय तुम्हाला काही दिवस तोट्यात करावा लागेल, असं दिसतं. त्यावर ते म्हणाले, की अहो, राज्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी हा प्रकल्प आम्ही मोठ्या धाडसाने उभा केला आहे. मात्र तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत माहिती घेऊन आम्हाला पोहोचलंच पाहिजे. आपल्या परीने आपण प्रयत्न केलेच पाहिजेत. आमचा सकाळ आधी पुण्याला केंद्रबिंदू ठेवत सुरू झाला आणि आता तो राज्यभर पसरला आहे.
परंतु शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी एक प्रभावी माध्यम हवेच. प्रतापरावांच्या निर्धाराचं मला खूप कौतुक वाटलं. पुढे जसा ‘अॅग्रोवन’ वाटचाल करू लागला; ते पाहून आम्हाला आश्चर्य वाटे. कदाचित, परिश्रमपूर्वक काम करणाऱ्या संपादकीय चमूचा तो परिणाम असावा. इंग्रजीत आपण ज्या शब्दाला रिच म्हणजेच पोहोच म्हणतो ती अॅग्रोवनची वर्षानुवर्षे वाढत गेली.
आता तर हे दैनिक कृषी आणि संलग्न क्षेत्रांच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नेमके काय पाहिजे याची उत्तम जाणीव या वृत्तपत्राला आहे. या वृत्तपत्राने कधीही कोणत्या एका प्रदेशावर किंवा पिकावर भर दिला नाही. मी व्हीएसआयमध्ये असल्यामुळे आमचा ओढा उसाकडे असतो. उसासंबंधीचा उत्पादनापासून ते साखर उद्योगातील बारीक घडामोडींपर्यंतचा सर्व मागोवा हे दैनिक उत्तमरीत्या घेत असते.
सर्व पिकांच्या बातम्या, ज्ञानतंत्रज्ञानाचा मागोवा, शास्त्रोक्त सल्ला असे सारे काही दिले जाते. मी सातत्याने गावशिवारांचा दौरा करत असतो. दुर्गम भागातही हे दैनिक पोहोचले असल्याचा अनुभव मी घेतला आहे. शेतीमधील नावीन्य काय, शेतीचे अर्थशास्त्र काय सांगते, कृषिपूरक जोडधंदे कोणते याची माहिती तर या वृत्तपत्रात; पण शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम हे वृत्तपत्र करत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.