
Sadabhau Khot Criticize Raju Shetti : मागच्या दोन महिन्यांपासून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मागील हंगामातील दुसरा हफ्ता ४०० रुपये आणि चालू वर्षातील ३५०० रुपये ऊसदर न मिळावा यासाठी आंदोलन सुरू आहे. दरम्यान यावर राजू शेट्टी यांच्या विरोधात आता रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व माजी मंत्री सदाभाऊ खोत मैदानात उतरले आहेत.
यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, 'राजू शेट्टी यांच्या मागणीनुसार उसाला दर मिळाल्यास मला शेतीचे अर्थकारण - समजत नाही, असे समजून मी राजकारण सोडतो,' तसेच राजू शेट्टी यांनी ३ हजार ५०० रुपये न दिल्यास त्यांनी राजकीय सन्यास घ्यावा असे आव्हान खोत यांनी पत्रकार परिषदेत दिले.
'यावर्षी उसाचे क्षेत्र घटल्याने साखरेचे उत्पादनही घटणार आहे. हंगाम लांबल्याने शेतकरी आणि कारखानदार यांचेही नुकसान होणार आहे. ऊस कर्नाटकात जाण्याचीही भीती आहे. यासाठी कारखानदारांनी गत हंगामातील फरक २०० रुपये आणि चालू हंगामात पहिला हप्ता ३२५० रुपये देण्यासाठी पुढे यावे. या मागणीसाठी रामचंद्र डांगे यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत केली असून, लवकरच ही समिती कारखानदारांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे.
केवळ लोकप्रिय घोषणा करण्यापेक्षा चळवळीत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करण्याची आवश्यकता आहे. स्वतःच्या राजकारणासाठी कोणीतरी शेतकरी चळवळीचा चुकीचा उपयोग करीत असेल, शेतकऱ्यांचे नुकसान करीत असेल तर ते चालू देणार नाही. तसेच आता लोक जागे झाले आहेत.
त्यामुळे कारखानदारांनीही याचे भान ठेवून कारखाने चालवावेत, अन्यथा सहकारी साखर कारखाने कधीकाळी होते, असे म्हणण्याची वेळ येईल.' दरम्यान, ऊसदराचा प्रश्न कायमचा मिटण्यासाठी साखर कारखान्यांमधील २० किलोमीटरच्या हवाई अंतराची अट रद्द करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.