
Nanded News : जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम २०२५ साठी प्रधानमंत्री पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. या वेळी एक रुपयात पीकविमा योजना बंद करण्यात आल्याने सोयाबीनसाठी हेक्टरी ११६० रुपये, तर कपाशीसाठी हेक्टरी ९०० रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे.
या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. कर्जदार, तसेच, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. भारतीय कृषी विमा कंपनी लि. या विमा कंपनी मार्फत राबविण्यात येणारी ही योजना सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद व मुग या पिकांसाठी लागू करण्यात आली आहे.
या योजनेत एक रुपयात पीकविमा योजना बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील ७ वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाच्या ५ वर्षांचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाणार आहे.
योजनेमध्ये सहभागासाठी शेतकऱ्यांना ओळखपत्र क्रमांक (Aफार्मर आयडी) असणे अनिवार्य आहे. पीकविमा नुकसान भरपाईसाठी, ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहील. पीक विमा नुकसान भरपाईसाठी ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे.
विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भविल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, पीक पेरा स्वयं घोषणापत्र, सातबारा, आठ (अ), व शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) आवश्यक आहे.
नुकसानीचे घटक केले बंद
या योजनेअंतर्गत खरीप हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी, पीक कापणी प्रयोग आधारे, तांत्रिक उत्पादन आधारे, सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई मिळेल.
हंगामात घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगातून प्राप्त होणाऱ्या सरासरी उत्पन्नाची तुलना ही उंबरठा उत्पन्नाशी करून हंगामाच्या शेवटी नुकसान भरपाई निश्चित करण्यात येणार आहे. यापूर्वी मिळणारे मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, विस्तृत स्थानिक नैसर्गिक आपत्ती, कापणी पश्चात नुकसान हे घटक वगळल्यामुळे आता केवळ उत्पादन आधारित नुकसान घटकानुसार भरपाई मिळणार आहे. या घटकांतर्गत आतापर्यंत सर्वांत कमी परतावा मिळाला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.