
Mumbai News : ‘‘राज्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी धोरण बदलणे गरजेचे आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादक अडचणीत असताना विमा कंपन्यांना पाठीशी का घातले जाते आहे,’’ असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पाटील आणि अभिजित पाटील यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
यावर कृषिमंत्री कोकाटे यांनी, ‘‘द्राक्ष उत्पादकांच्या समस्यांबाबत लवकरच बैठक बोलावू. या बैठकीला लोकप्रतिनिधींसह विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनाही बोलावू,’’ असे आश्वासन तरुण आमदारांना थोपवले.
रोहित पाटील यांनी, सांगलीतील द्राक्ष उत्पादकांना हवामान बदलाचा मोठा फटका बसत असून, काढणीनंतर होणारी खरडछाटणी आणि काडी फुटण्याच्या अवस्थेत पावसामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या उत्तरात वरील मुद्दा नाकारण्यात आला. या उत्तरावर हरकत घेत रोहित पाटील यांनी ज्या अधिकाऱ्याला किंवा शास्त्रज्ञानाला उत्पादनात घट येत नाही असे वाटते, त्याच्या घरचा पत्ता किंवा मोबाइल क्रमांक द्या, अशा शब्दांत फटकारले.
ते म्हणाले, की खरडछाटणीनंतर नवीन काडी येते त्यानंतर घड धरण्यावर परिणाम होतो. मात्र एनआरसीचे याविरुद्ध म्हणणे असावे, त्यामुळे आम्ही त्यांना भेटतो, असे सांगून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. द्राक्ष उत्पादकांसाठी कृषी धोरण बदलावे लागेल. ते केले नाही तर आता १० हजार हेक्टरवरील उत्पादन सात हजार हेक्टरवर आले आहे. पुढील काळात द्राक्षे शोधून सुद्धा सापडणार नाही, अशी भीती व्यक्त केली.
यावर श्री. कोकाटे यांनी सांगली आणि नाशिक जिल्ह्यांत द्राक्ष उत्पादन जास्त होते, त्यामुळे याबाबत बैठक घेऊ. त्यासंदर्भात शिफारशी कराव्यात, त्यावर विचार करू, असे आश्वासन दिले. मात्र, त्यावरही पाटील यांनी आक्षेप घेत, मागील अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला तेव्हाही असेच सांगण्यात आले होते
असे सांगून अनेक शेतकऱ्यांनी विम्याबाबत दावा करूनही तो दिला जात नाही, अशी माहिती दिली. हेमंत ओगले यांनी पुनर्रचित हवामान योजना फळपीक विमा योजनेत पुनर्रचित हवामान योजनेत मंडलाऐवजी गाव हे क्षेत्र निश्चित करण्यात यावे, तसेच पावसाच्या खंडाबाबत निश्चितता करण्यात यावी अशी मागणी केली.
अभिजित पाटील आक्रमक
अभिजित पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना भरपाई न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, त्यांना बोलू न दिल्याने ते आक्रमक झाले. ते म्हणाले, की सोलापूर जिल्ह्यात २० हजार ४०० हेक्टरवर द्राक्ष लागवड आहे. हा जिल्हा द्राक्षाचे हब आहे. मे २०२४ मध्ये सोलापूर जिल्ह्यात ३७,८५४ शेतकरी बाधित आहेत, त्यात केवळ सात शेतकरी द्राक्ष उत्पादकांना मदत मिळाली आहे. द्राक्षाचे क्षेत्र २० हजार हेक्टर आणि नुकसान झाले.
साडेचारशे हेक्टरवर नुकसान झाले, मात्र भरपाई केवळ ३३ हेक्टरला मिळाल्याने द्राक्ष बागायतदार अडचणीत आहेत. एक एकरच्या लागवडीसाठी सात ते आठ लाख रुपये खर्च आहे. शेतकरी आत्महत्या करेल अशी अवस्था आहे. तरी सरकार या विमा कंपन्यांना पाठीशी का घालत आहे. या शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, असा प्रश्नांचा भडिमार केला.
पंचनामे झालेत तर मदत मिळणार
मंत्री कोकाटे यांनी ‘‘ही मदत अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळते. ज्यांनी अर्ज केले आहेत आणि ज्यांचे पंचनामे झाले आहेत त्यांनाच मदत मिळेल,’’ असे सांगितले. मात्र, उत्तरावर समाधान न झाल्याने अभिजित पाटील बोलण्यास उठले असता माईक बंद होता. त्यामुळे ते आक्रमक झाले. अखेर तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी पाटील यांनी बैठकीला बोलावण्याचे निर्देश दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.