Grape Farming : द्राक्ष बागेतील खरड छाटणीच्या समस्या

Grape Harvesting : वेध शाळेच्या अंदाजानुसार, पुढील काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा वातावरणाच्या परिस्थितीचा विविध अवस्थेतील द्राक्ष बागेत काय समस्या उद्‍भवतील, याची माहिती घेऊ.
Grape Farming
Grape FarmingAgrowon

प्रदीप काकडे, डॉ. जे. के. ढेमरे, डॉ. एस. बी. जाधव

Grape Orchard Management :

जुन्या बागेतील समस्या

फळ काढणी झाल्यानंतर द्राक्ष बागेत वेलीला काही काळ विश्रांती देऊन पुन्हा खरड छाटणी घेतली जाते. प्रत्येक भागात या कालावधीत खरड छाटणी करण्याचे काम सुरू होईल. मात्र वातावरणातील जास्त तापमानाचे काही विपरीत परिणाम वेलीवर दिसून दोन महत्त्वाच्या अडचणी दिसून येतात.

अ) डोळे मागेपुढे फुटणे

खरड छाटणीनंतर डोळे एकसारखे व लवकर फुटणे अतिशय महत्त्वाचे असते. या प्रक्रियेमध्ये बागेतील तापमान व आर्द्रता महत्त्वाची जबाबदारी निभावते. खरड छाटणीवेळी काड्यांची जाडी कमी जास्त असू शकते. त्यानुसार त्यावरील डोळ्यांची जाडीसुद्धा लहानमोठी असू शकते.

त्याचा परिणाम डोळे मागे पुढे फुटण्यामध्ये होतो. वास्तविक काडीवरील डोळे एकसारखे फुटण्याकरिता ओलांड्यावरील प्रत्येक काडीची जाडी एकसारखी असणे गरजेचे असते.

खरड छाटणीनंतर ७ ते ८ पानांच्या अवस्थेत फुटींची विरळणी व्यवस्थित झालेली असल्यास या वेळी थोडा उशीर लागला तरी फुटी एकसारख्या निघतील. डोळे लवकर व एकसारखे फुटण्याकरिता वेलींचे खोड व ओलांडा रसरशीत असणे गरजेचे असते.

Grape Farming
Grape Farming : द्राक्ष पिकातील खरड छाटणीची पूर्वतयारी

त्यासाठी खरड छाटणीच्या ३ ते ४ दिवसांपूर्वी बोदामध्ये भरपूर पाणी दिले पाहिजे. त्यामुळे ओलांड्याचा रसरशीतपणा वाढेल, परिणामी, लवकर डोळे फुटतील.

बागेतील तापमान कमी करण्याकरिता शेडनेटचा वापर करता येईल. शेडनेट बागेत लावतेवेळी ओलांड्यापासून साधारणतः दीड ते दोन फूट उंच राहील, अशा प्रकारे नियोजन करावे. यामुळे तापमान कमी होऊन आर्द्रता जास्त वाढेल. बाग लवकर फुटण्यास मदत होईल.

ब) ओलांडा डागाळणे

खरड छाटणीपूर्वी साधारण १५ दिवस आधी आपण बागेमध्ये चारी घेऊन खतांचा पुरवठा करतो. चारी घेतेवेळी साधारणतः ३० टक्क्यांपर्यंत मुळी तुटली तरी त्याचा फायदा होतो. या ठिकाणी नवीन कार्यक्षम अशी पांढरी मुळी तयार होते. ही मुळी

जमिनीत उपलब्ध केलेले अन्नद्रव्य व पाणी तितक्याच कार्यक्षमतेने वर उचलून वेलीला पुरवठा करते. मात्र ३० टक्क्यांपेक्षा अधिक मुळे तुटल्यास मात्र नवीन मुळी तयार होण्याकरिता उशीर लागू शकतो. या उशिरामुळे नवीन फुटी निघण्याकरिता आवश्यक त्या अन्नद्रव्याचा पुरवठा व वापर याचा ताळमेळ बसणार नाही. परिणामी, ओलांड्यावरील डोळे उशिरा फुटतील.

Grape Farming
Grape Orchard Management : नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकटची पूर्वतयारी

बऱ्याचदा आपण चारी घेतल्यानंतर शेणखत व इतर अन्नद्रव्य टाकण्यास विलंब होतो. जास्त काळ मुळे उन्हात आणि उष्ण वातावरणात राहिल्यामुळे मुळांच्या पेशी सुकतील. याचाच परिणाम डोळे उशिरा फुटण्यावर होईल. ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेल्या तापमानात ओलांड्यावर एकसारख्या तीव्रतेचा सूर्यप्रकाश जास्त काळ राहिल्यास डोळे फुटणार नाहीत. परिणामी ओलांडा डागाळण्याची समस्या बागेत निर्माण होईल. या वर महत्त्वाच्या उपाययोजना म्हणजे चारी घेतल्यानंतर लगेच शेणखत व इतर अन्नद्रव्ये टाकून वेळीच चारी झाकून घ्यावी. बोध पाण्याने चांगला भिजवून घ्यावा.

हायड्रोजन सायनामाइडचा कमीत कमी (२० ते २५ मिलि प्रति लिटर पाणी) प्रमाणात वापर केल्यास डोळे लवकर फुटण्यास मदत होईल. ओलांडा डागाळण्याचे टळेल. ओलांड्याची लांबी जास्त असल्यास शेंड्याचे प्रभुत्व (अपायकल डॉमिनन्स) जास्त कार्यरत राहते. त्यामुळे ओलांड्याच्या मागील भागातील डोळे एकतर उशिरा फुटतात किंवा फुटतच नाही. त्यामुळे खरड छाटणी करतेवेळी ओलांड्याची लांबी योग्य तितकीच राहील, याकडेही लक्ष द्यावे. या वेळी पुन्हा ओलांडा वाढवता येईल.

नवीन बागेतील अडचणी

मागील हंगामात (ऑगस्‍ट ते सप्टेंबर) कलम केलेल्या बागेत फेब्रुवारी महिन्यात री-कट घेऊन खोड, ओलांडे व मालकाडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. याच काळात बागेत काही अडचणी उद्‍भवत असल्याचे दिसून येते. या समस्यांमध्ये नवीन फुटीची वाढ अचानक थांबणे व पाने पिवळी पडण्याची समस्या महत्त्वाची आहे. द्राक्ष लागवडी खालील बऱ्याचशा बागेत कमी अधिक प्रमाणात चुनखडीचे प्रमाण दिसून येते.

बागेत ५ ते २२ टक्क्यांपर्यंत चुनखडी असलेल्या जमिनीतून महत्त्वाच्या अन्नद्रव्याची उपलब्धता होत नाही. परिणामी द्राक्ष वेलींची वाढ होण्यास अडचणी येतात. त्यांच्या पेऱ्यातील अंतर कमी होणे, पानांचा आकार कमी राहणे व पानांच्या वाट्या होऊन पाने पिवळी पडणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. एकदा वाढ खुंटल्यास पुढील काळात फार अडचणी येतात. त्यामुळे रि-कट घेण्यापूर्वीच माती परीक्षण करून घेतल्यास आपल्या जमिनीतील चुनखडीच्या प्रमाणाचा अंदाज येईल.

या प्रमाणानुसार जमिनीत गंधकाची उपलब्धता करता येईल. ३ टक्के चुनखडी असलेल्या जमिनीत रूट स्टॉकची मुळे सहज तग धरू शकतात. मात्र त्यापेक्षा जास्त प्रमाण असल्यास अडचणीमध्ये वाढ होते. त्यामुळे ५ ते ८ टक्के चुनखडी असलेल्या ठिकाणी साधारणतः ४० किलो गंधक प्रति एकर, ८ ते १५ टक्के चुनखडी असल्यास ७० ते ८० किलो गंधक प्रति एकर व त्यापेक्षा अधिक चुनखडी असल्यास त्या प्रमाणात १०० ते १२० किलो गंधक प्रति एकर प्रमाणे उपलब्धता करावी.

डॉगरिज या खुंटावर कलम केलेल्या प्रत्येक बागेत पहिल्या वर्षी पाने पिवळी पडण्याची समस्या दिसून येते. रि-कट नंतर निघालेल्या फुटी ५ ते ६ पाने अवस्थेत असल्यापासून फेरस सल्फेटची फवारणीद्वारे पूर्तता करावी. प्रथम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी असे सुरू करून पुढे जसजशी पानांची संख्या वाढेल, तसेतसे फेरस सल्फेटचे प्रमाण वाढवता येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत ३ ग्रॅमपेक्षा अधिक प्रमाण नसावे.

प्रदीप काकडे, ९१६८४२८६९८ (उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com