
Ahilyanagar News : यंदा जानेवारीपासूनच उन्हाचा चटका वाढला. मार्च महिन्याच्या तोंडावर तर उन्हाची तीव्रता अधिक झाली आहे. त्याचा परिणाम म्हणजे अनेक भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. फळपिके, भाजीपाला, आंब्यावर होऊ लागला आहे.
यंदाची आंब्याची स्थिती चांगली आहे. फळे अजून लहान आहेत. मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे फळगळती होऊ लागली आहे. दूध उत्पादनातही घट होऊ लागली आहे. आताच अशी परिस्थिती असली तरी मे महिन्यात काय स्थिती असेल याची शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात दरवर्षीच उन्हाचा भाजीपाला आणि फळांवर परिणाम होते. यंदा मात्र उन्हाचा परिणाम लवकर जाणवू लागला आहे. जिल्ह्यात साधारण पंचवीस हजार हेक्टरपर्यंत भाजीपाल्याचे क्षेत्र तर तीस हजारांपेक्षा अधिक फळबागांचे क्षेत्र आहे. दोन्ही क्षेत्रांत दरवर्षी कमी-जास्तपणा येतो.
दरवर्षीच उन्हाळ्यात उष्णतेचा भाजीपाला, फळे, दूध उत्पादनावर परिणाम होतो. अनेक भागांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यंदा मात्र उन्हाचा चटका लवकर वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे आंब्याच्या छोट्या कैऱ्याची गळती होत आहे. डाळिंब, मोसंबी, संत्रा फळाच्या उघड्या भागात डाग पडू लागले आहेत.
भाजीपाल्यात टोमॅटो, कारली, शेवग्याला अधिक फटका बसू लागला आहे. टोमॅटोची फळे कोमेजत असून फळांची वाढ मंदावत आहे. या सर्व बाबींचा थेट दरावर परिणाम होत आहे. यंदा जिल्हाभर कांदा लागवड अधिक झाली आहे.
मात्र पाणी कमी पडल्याने उष्णतेमुळे कांद्याचे नुकसान होत आहे. दूध उत्पादनातील तूट वाढ आहेत. दूध उत्पादनावर फारसा परिणाम दिसत नसला तरी पुढील पंधरा दिवसांत दुधावरही मोठा परिणाम होईल असे दूध उत्पादक शेतकरी नंदू रोकडे यांनी सांगितले.
अडीच महिन्यांत सहा अंश सेल्सिअसने वाढ
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांत किमान तापमानात ६ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात १९ तारखेला कमाल २७.६, तर किमान ७.३ अंश सेल्सिअस तापमान होते.
२६ डिसेंबरला कमाल तापमान स्थिर होते, मात्र किमान तापमानात वाढ झाली. जानेवारी १९ तारखेला जास्तीत जास्त २९, तर कमीत कमी १२ अंश सेल्सिअस तापमान होते. २४ तारखेला ते ३१ अंश सेल्सिअसवर गेले. या महिन्यात (फेब्रुवारी) शेवटच्या आठवड्यात १८ फेब्रुवारीला कमाल ३२ व किमान १३ अंश सेल्सिअस तापमान होते. २५ फेब्रुवारीला कमाल ३३.४ व किमान १३.७ अंश सेल्सिअस तापमान झाले आहे.
काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रामीण हवामान कृषी विभागाचे सहसमन्वयक डॉ. रवी आंधळे यांनी सांगितले, की वाढत्या तापमानामुळे भाजीपाला, फळपिकांना पाण्याचा ताण कमी पडतो. त्यामुळे भाजीपाल्यावर लालकोळी, तुडतुड्यांचा तर फळांवर डाग पडू शकतात. फळगळ होऊन नुकसान होऊ शकते.
त्यावर कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशकांची फवारणी करावी. सिंचनाची वारंवारता वाढवावी. ओलाव्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. दूध उत्पादनात घट होऊ नये यासाठी जनावरांना सावलीत बांधावे. गोठ्याच्या छपरावर पेंढ्याची सावली करून उन्हाची तीव्रता कमी करता येईल. खाद्यात हिरवे गवत, प्रथिनयुक्त खनिजे मिश्रण, मीठयुक्त खाद्याचा समावेश असावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.