
Jalgaon News: खानदेशात कापूस पीक प्रमुख आहे. तसेच कमाल क्षेत्र कोरडवाहू आहे. पण कोरडवाहू व कापूस शेती नैसर्गिक व अन्य समस्यांनी संकटात आल्याने सालगड्यांचा मेहनताना आता शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे.
सालगडी मेहनताना दर वर्षी वाढत आहे. मात्र शेती तोट्यात आल्याने समस्या अधिक बनल्या आहेत. नववर्षाला व अक्षय्य तृतीयेस आपल्या शेतीकामासाठी सालगडी नेमण्याची परंपरा आहे. अर्थात यंदाही गावोगावी सालगडी नेमले जातील, त्यांचा मेहनताना काय, हेदेखील स्पष्ट होईल. पण कापूस शेती तोट्यात आली आहे. शिवाय यांत्रिक शेती वाढली आहे. पशुधन घटले आहे. यामुळे सालगड्यांची संख्या शेतकरी कमी करतील, अशी स्थिती आहे.
अनेक शेतकरी गुढीपाडव्याला किंवा नवर्षाला आपल्या शेतात सालगड्याची नेमणूक करतात. तर काही शेतकरी अक्षय तृतीयेस सालगडी नेमतात. मोठे शेतकरी आपल्या सालगड्याचे अस्थायी निवासस्थान, वर्षभराचे धान्य आदी व्यवस्थाही करतात. ८० हजार ते ९० हजार रुपये प्रतिवर्ष किंवा १२ महिन्यांच्या कामासाठी हा मेहनताना सध्या दिला जात आहे. यंदा हा मेहनताना अनेकांना परवडलेला नाही.
कोरडवाही किंवा हंगामी बागायती शेती खानदेशात अधिक आहे. बारमाही बागायती शेती फारशी नाही. त्यात कापसाची सर्वाधिक लागवड केली जाते. एकूण खरिपातील ६० ते ६५ टक्के क्षेत्रात कापूस पीक असते. हे क्षेत्र खानदेशात एकूण साडेआठ लाख ते नऊ लाख हेक्टरवर असते. त्यापाठोपाठ तृणधान्य पेरणी केली जाते. परंतु मागील वेळेस दुष्काळ होता. यंदा ओला दुष्काळ आला. याचा फटका शेती व शेतकऱ्यास बसला. शेतीचा खर्च निघाला नाही. त्यात सालगडी मेहनताना परवडला नाही.
यातच बैलजोडीकरवी फारशी आंतरमशागत, वाहतुकीची कामेही मोठे, मध्यम शेतकरी करीत नाहीत. यामुळे सालगड्यांची संख्याही शेतकऱ्यांनी कमी करण्यावर भर दिला आहे. जेथे पूर्वी चार ते पाच सालगडी असायचे, तेथे आता दोनच सालगडी दिसतात. यातच ज्याला ट्रॅक्टर चालविता येतो, औत हाकता येतो, अशा सालगड्यांना शेतकरी पसंती देतात. कारण अनेकदा ट्रॅक्टरची कामे करावी लागतात, काही वेळेत आंतरमशागतीची कामेही पार पाडावी लागतात. यामुळे अष्टपैलू सालगडी मोठ्या शेतकऱ्यांना आता हवे आहेत.
आदिवासी क्षेत्रातील मंडळी अधिक
खानदेशात आदिवासी बहुल क्षेत्रातील म्हणजेच सातपुडा पर्वत भागातील अनेक जण सालगडी म्हणून नियुक्त केले जातात. स्थानिक क्षेत्रात सालगडी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यात अनेकदा फसवणूक होते, सालगडी पैसे घेऊन रातोरात पसार होतात, यामुळे प्रामाणिक, ओळखीच्या मंडळीकडून सालगड्यांची नियुक्ती करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. परंतु यंदा सालगडी संख्या कमी होईल, असे दिसत आहे. हंगाम व पाऊस कसा राहील यानुसार महिनदार नेमणूक करण्याचा पवित्रा, भूमिका अनेकांनी यंदा घेतल्याची स्थिती आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.