
Pune News : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. धरणांतील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असून, नागरिकांकडून मागणीही वाढली आहे. त्यामुळे राज्यातील धरणांतील पाणीपातळी वेगाने कमी होऊ लागला आहे. येत्या काळात पाण्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार असल्याने पाण्याची चांगलीच टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जोरदार पावसामुळे लहान व मध्यम स्वरूपामध्ये असलेली ऊर्ध्व पैनगंगा, गोसी खुर्द, निम्न वर्धा, हतनूर, खडकवासला, चासकमान, वीर, गुंजवणी, घोड, मुळा, जायकवाडी, उजनी, कोयना असे अनेक प्रकल्प भरल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता.
त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली होती. शेतीच्या पाण्याचा काही प्रमाणात प्रश्न सुटण्यास मदत झाली होती. परंतु रब्बी हंगामात पाण्याची मागणी वाढल्यामुळे जानेवारीपासून धरणांतील पाणीपातळी कमी झाली आहे. त्यात आता उन्हाचा चटका आणखी वाढल्यास येत्या काळात उर्वरित धरणेही कोरडी पडण्याची शक्यता वाढली आहे.
राज्यात जलसंपदा विभागाकडील लहान, मध्यम व मोठे अशा एकूण दोन हजार ९९७ प्रकल्पांत १४२९.७७ टीएमसीपैकी ६७८.७२ टीएमसी (१९.२२४.७५ दशलक्ष घनमीटर) एवढा म्हणजेच ४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच काळात ४०.१६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास सात टक्क्यांनी पाणीसाठा अधिक आहे. मात्र उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत असल्याने पाण्याची मागणी अधिक असली तरी बाष्पीभवनाचा वेगही अधिक वाढणार आहे.
सध्या मराठवाड्यातील धरणांत अजूनही चांगला पाणीसाठा उपलब्ध असून एकूण ९२० धरणांत अवघा ११९.२३ टीएमसी म्हणजेच ४६ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच धरणात अवघा २१ टक्के पाणीसाठा होता. यंदा चांगला पाणीसाठा असून पैठण, माजलगाव, रोशनपुरी, हिरडपुरी, येलदरी, माजलगाव, मांजरा, मंगरूळ, विष्णुपुरी, तेरणा, लिंबाळा, मदनसुरी, शिवनी, टाकळगाव देवळा, निम्नदुधना या धरणांत पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. तर काही धरणांत अत्यंत कमी पाणीसाठा आहे.
नागपूर विभागातील धरणांत अजूनही बऱ्यापैकी पाणी आहे. एकूण ३८३ धरणांत १०८.०१ टीएमसी म्हणजेच ४५.३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी ५० टक्के पाणी होते. अमरावती विभागातील २६४ धरणांत ९९.५७ टीएमसी म्हणजेच ५४ टक्के पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी ५२ टक्के पाणी होते.
नाशिक विभागातील ५३७ धरणांत १२९.८५ टीएमसी म्हणजेच ४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या गेल्या वर्षी ४२ टक्के पाणीसाठा होता. पुणे विभागातील ७२० धरणांत ३५०.९६ टीएमसी म्हणजेच ४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी ५२ टक्के पाणीसाठा होता. कोकण विभागातील १७३ धरणांत ७६.५१ टीएमसी म्हणजेच ५४ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी ५२ टक्के पाणीसाठा होता.
मोठ्या प्रकल्पात ४७ टक्के पाणीसाठा :
राज्यात कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १३८ मोठी धरणे आहेत. या धरणांत ७२०.७५ टीएमसी म्हणजेच सरासरी ४७.९९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पांत ३९.१६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी जवळपास ९ टक्क्यांनी अधिक पाणीसाठा आहे.
यामध्ये नागपूर विभागात सध्या ८५.१० टीएमसी म्हणजेच ४५ टक्के, अमरावती विभागात ६३.३४ टीएमसी म्हणजेच ५० टक्के, मराठवाड्यातील धरणांत १३५.५८ टीएमसी म्हणजेच ५३ टक्के, नाशिक विभागात ८६.२० टीएमसी म्हणजेच ५१ टक्के, पुणे विभागात ३०२.९५ टीएमसी म्हणजेच ४५ टक्के, कोकण ४७.५५ टीएमसी म्हणजेच ४७ टक्के पाणीसाठा आहे.
राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा, टीएमसी, गेल्या वर्षीची टक्केवारी
धरण --- एकूण क्षमता -- पाणीसाठा -- यंदाची टक्केवारी -- गेल्या वर्षीची टक्केवारी
उजनी---११७.२१--- १५.१३---२८ -- ०
कोयना---१०५.२४---५३.५६---५३ --- ४८
जायकवाडी---१०२.६७---२५.२४--३२ -- ८९
माजलगाव---१०.९८---४.१९---३८ -- ०
मांजरा---६.२५---२.९२---४६ -- ७
निम्न दुधना---८.५४---१.२२---१४ --- ४९
बेंबळा---६.४९---२.३०--- ३५ --३७
मुळा ---२१.५०---१०.५२---४८ -- ३७
तोतलाडोह -- ३५.९० ---२१.६७---६०---६१
ऊर्ध्व वर्धा ---१९.९१---१०.२५--५१--५२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.