Kolhapur News : ऊस दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आजपासून पुणे-बेंगलोर महामार्गावर शिरोली परिसरात चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन तीव्र करण्याची तयारी करण्याचा इशारा देऊन दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर मागण्या मान्य होईपर्यंत महामार्गावर मुक्काम ठोकण्याची तयारी करण्यात आली आहे.
मागील हंगामात गाळप केलेल्या ऊसाला १०० रुपये दुसरा हप्ता आणि यंदाची पहिली उचल ३५०० रुपये जाहीर मागणीसाठी राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गाळपाला अद्याप गती न मिळाल्याने कारखानदारांची चांगलीच कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा झाली. परंतु तोडगा न निघाल्याने आजपासून कोल्हापूरात चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे घेण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रशासनाच्यावतीने मनधरणी सुरू आहे. परंतु राजू शेट्टी मागील हंगामात ऊसाला टनास १०० रुपये देण्याच्या मागणीवर ठाम असल्याने आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागण्या मान्य होईपर्यंत महामार्गावरच मुक्काम ठोकण्याची तयारी सुरू केली आहे.
राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी शिरोली परिसरात जमल्यामुळे किणी टोल नाका परिसरात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. तसेच बेंगलोर आणि पुणे दोन्ही दिशेला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रस्त्याच्या कडेला ५ हजार शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.