Khandesh Rain Update : खानदेशात पाऊस ओसरला

Rain News : खानदेशात शुक्रवार (ता. ३० ऑगस्ट) ते मंगळवार (ता. ३) या पाच दिवसांच्या कालावधीत अनेक भागात जोरदार पाऊस झाला
Khandesh Rain News
Khandesh Rain NewsAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात बुधवारी (ता. ४) पाऊस अनेक भागात कमी तर काही भागात नव्हता. पाऊस ओसरला असून, यंदा ऑगस्ट अखेरीस अनेक भागांत १०० टक्के पाऊस झाला आहे. तसेच अनेक प्रकल्प तुडुंब भरल्याने पुढे रब्बीबाबत आशादायी चित्र राहील.

खानदेशात शुक्रवार (ता. ३० ऑगस्ट) ते मंगळवार (ता. ३) या पाच दिवसांच्या कालावधीत अनेक भागात जोरदार पाऊस झाला. रविवारी (ता. १) जळगाव जिल्ह्यातील जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ या भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला. मुक्ताईनगर, जामनेरातील तोंडापूर, मालदाभाडी येथे अतिवृष्टी झाली.

Khandesh Rain News
Khandesh Rain : खानदेशात पावसाचा धुमाकूळ; पिके हातची जाण्याची भीती

तसेच सोमवारी (ता. ३) व मंगळवारीदेखील (ता. ३) खानदेशात अनेक भागांत पाऊस झाला. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल या भागातही चांगला पाऊस झाला. तसेच अन्य भागात मध्यम ते हलका पाऊस झाला. जळगाव, धुळे जिल्ह्यात १०० टक्के पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत ६३२ मिलिमीटर पाऊस पडतो.

या कालावधीत पडणारा पाऊस जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत जळगाव जिल्ह्यात पडला. धुळ्यात ५६५ मिलिमीटर पाऊस वर्षभरात पडतो. धुळ्यातही चांगला पाऊस जून ते ऑगस्ट या कालावधीत झाला आहे. काही भागांत अतिपावसाने पिके हातची गेली आहेत.

Khandesh Rain News
Khandesh Rain : खानदेशात अतिपावसाने उडवली दाणादाण

उडीद, मूग पीक खराब

खानदेशात उडीद, मूग पीक अतिपावसाने खराब झाले आहे. यामुळे उडीद, मूग उत्पादक संकटात सापडले आहेत. खानदेशात सुमारे २१ हजार हेक्टरवर मुगाची तर सुमारे २५ हजार हेक्टरवर उडदाची पेरणी झाली आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात उडदाची पेरणी १६ हजार हेक्टरवर झाली होती. पाऊस थांबावा यासाठी शेतकरी आळवणी करीत होते. बुधवारी (ता. ४) अनेक भागात पाऊस नव्हता. तर गुरुवारी (ता. ५) सकाळपासून वारा व अधूनमधून ऊन अशी स्थिती होती.

दोन सिंचन प्रकल्प भरले

मागील पाच दिवसातील पावसात जळगाव जिल्ह्यात जामनेरातील तोंडापूर, पाचोरा तालुक्यातील अग्नावती हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. अग्नावती प्रकल्पात मागील वर्षी शून्य टक्के जलसाठा होता. अग्नावतीसह तोंडापूर प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. तसेच जामनेरातील वाघूर नदीलाही महापूर आला. यामुळे वाघूर धरणातील जलसाठा ८२ टक्क्यांवरून ९६ टक्क्यांवर पोचला. वाघूर धरण मागील वर्षीदेखील १०० टक्के भरले होते. तसेच गिरणा धरणातही ९६ टक्के जलसाठा आहे. गिरणा धरणाची साठवणक्षमता १८ टीएमसी असून, जळगाव जिल्ह्यातील २१ हजार हेक्टरला त्याचा लाभ आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com