Khandesh Rain : खानदेशात पावसाचा धुमाकूळ; पिके हातची जाण्याची भीती

crop damage : खानदेशात मागील तीन-चार दिवसांत अनेक भागांत जोरदार ते मध्यम पाऊस झाला आहे. काही भागांत जोरदार पावसाने दाणादाण उडाली. उडीद, मूग पिके हातची जातील, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Khandesh Rain Update : जळगाव ः खानदेशात मागील तीन-चार दिवसांत अनेक भागांत जोरदार ते मध्यम पाऊस झाला आहे. काही भागांत जोरदार पावसाने दाणादाण उडाली. उडीद, मूग पिके हातची जातील, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात एकूण सरासरीच्या १०० टक्के पाऊस झाला आहे. जून ते ऑगस्ट या तीनच महिन्यांत जळगावात पावसाने सरासरी ओलांडली आहे. ६३२ मिलिमीटर पाऊस जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत पडतो. परंतु एवढा पाऊस जून ते ऑगस्ट या काळात झाला आहे. धुळे व नंदुरबारमध्येही पावसाने धुमाकूळ घातला आहे. तेथेही तीनच महिन्यांत ९५ टक्क्यांवर पाऊस झाला. नंदुरबारमध्ये नवापूर, अक्कलकुवा भागात अतिपावसाने अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. यामुळे सुरत-धुळे महामार्गावरील वाहतूक काही

तास बंद करावी लागली होती. रंगावली नदीस मोठा पूर आल्याने नंदुरबारातील नवापूर भागात वाहतुकीवर परिणाम झाला. धुळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत ५६५ मिलिमीटर पाऊस पडतो. नंदुरबारात ८५२ मिलिमीटर पाऊस या कालावधीत पडतो. परंतु या दोन्ही जिल्ह्यांतही तीनच महिन्यांत ९५ टक्क्यांवर पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यातील जामनेर, बोदवड मुक्ताईनगर व भुसावळ भागात अतिपाऊसही मागील तीन दिवसांत झाला. जामनेरातील तोंडापूर व मालदाभाडी येथे अतिवृष्टी झाली. मुक्ताईनगरातही अतिवृष्टी झाली.

Crop Damage
Khandesh Rain : खानदेशात पावसाचा धुमाकूळ

पिकांची हानी

अतिपावसाने कापूस, उडीद, मूग ही पिके हातची जातील, अशी स्थिती आहे. कारण सतत पाऊस सुरूच आहे. पावसाची फारशी उघडीप नाही. ऊन, निरभ्र वातावरण नसते. यामुळे पिकहानी वाढत आहे. खानदेशात प्रमुख पीक कापूस आहे. आठ लाख हेक्टरवर कापूस पीक आहे. कापूस पिकास अतिपाऊस नको असतो. परंतु यंदा चार महिन्यांमध्ये अपेक्षित असलेला पाऊस तीनच महिन्यांत झाल्याने कापूस पिकाची हानी सुरू झाली आहे. काळ्या कसदार जमिनीत कापूस पिकाची स्थिती बिकट आहे. परंतु हलक्या, मध्यम जमिनीत कापूस पीकस्थिती बरी आहे. उडीद, मूग पिकाच्या शेंगा काढणीवर किंवा मळणीवर आल्या होत्या. अशात पावसाने शेंगांना कोंब फुटू लागले आहेत.

वाघूर नदीचा रुद्रावतार

छत्रपती संभाजीनगरातील अजिंठा घाट व माथ्याकडे उगम असलेल्या वाघूर नदीला महापूर आला आहे. घाट-माथ्यासह जामनेरात अतिपाऊस झाल्याने नदीने रुद्रावतार धारण केला. नदीचे पाणी वाकोद व लगतच्या शिवारात शिरले आहे. वाकोद व परिसरातील केळीच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. तसेच जामनेराील हिवरी दिगर व पिंपळगाव येथेही केळीच्या शेतांत पाणी शिरल्याने पाच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. हिवरी दिगर गावातील पाच घरेही नदीच्या पुरात वाहून गेली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com