
Kolhapur News : ‘भेगाळल्या भुईपरी जिणं, अंगार जिवाला जाळी, बळ दे झुंजायला किरपेची ढाल दे,’ या अस्वस्थ करणाऱ्या ओळी... अगदी असंच जिणं वाट्याला आलंय ते समृद्ध समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर. कायमच पावसाची अवकृपा असणारा पूर्व भाग तर विमनस्क आहेच, पण पावसाळा संपेपर्यंत उसंत नसणारे तालुकेही पहिल्यांदाच तहानले आहेत. या भागात पावसाशिवाय पाण्याचे इतर स्रोत नसल्याने होणारे पीक नुकसान मोठे आहे. ‘यंदाच काही खरं नाही’, अशीच सार्वत्रिक प्रतिक्रिया खरिपाचे भवितव्य सांगणारी.
जिथून पाऊस सुरू होतो, दोन-दोन महिने सूर्यदर्शन होत नाही तो चंदगड तालुका उन्हाने भाजून निघतोय, बहुतांशी गावे तहानली आहेत. अगदी दहा किलोमीटरनजीक हंबेरे, आसगाव, तुळये, श्रीपादवाडी आदी गावपरिसरांत नाचणीसारखी पिके माना टाकत आहे. सतत पाणी वाहणाऱ्या भात शेती आज भेगाळली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील आजरा, चंदगड, शाहूवाडी, गगनबावडा, पन्हाळा हे तालुके पूर्णपणे जादा पावसाचे. छोटी छोटी शेती व त्यामध्ये घेतली जाणारी भात, नाचणा पिके हेच या तालुक्यांचे वैभव. मात्र तब्बल एक महिन्यापासून गायब झालेल्या पावसामुळे पीक वाचविण्याकरिता कोणी ओढ्यातून पाणी घेतोय, तर कोणी पाणी असणाऱ्याकडे विनवणी करत असल्याचे सध्या चित्र आहे.
यंदा सुरुवातीपासूनच खरिपाचे गणित विस्कटले. अनेकांनी एक महिना उशिरा आलेल्या पावसावर भाताची पेरणी केली, उगवणही झाली, पण भवितव्याची खात्री नव्हती. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर रोप लावण झाली. पण तेव्हापासून आजपर्यंत पाऊस गायबच आहे. भरीसभर म्हणून कडक ऊन आणि प्रचंड उष्णतेसह रोगराईने पिकांना ग्रासले आहे.
प्रत्येक वर्षी पश्चिम भागात पाऊस आणि पूर्व भागात पूरस्थिती सारखीच स्थिती असते. यंदा पूर्व भागात पूरस्थिती नाही. हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत पिकांना विहिरी-नद्यांचे पाणी देऊन जगविण्याची कसरत सुरू आहे. सोयाबीनवर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव होत आहे. पावसाच्या उघडिपीचा उसालाही मोठा फटका बसत आहे, वाढ खुंटल्याचे चित्र आहे. ऊस उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या या तालुक्यांना उत्पादनात फटका बसण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यांत पडणाऱ्या पावसापैकी केवळ ६६.३ टक्केच पाऊस झाला. १ ऑगस्ट ते २० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी २८२.१ मि.मी. पाऊस पडतो. या कालावधीत जिल्ह्यात ९५.३ मि.मी. (३३.७८ टक्के) पाऊस झाला आहे. एक जून ते २० ऑगस्ट या कालावधीत १३३०.५ मि.मी. इतका सरासरी पाऊस होतो. या वर्षी तो ७९१.३ मि.मी. म्हणजे ५९.५ टक्के झाला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.