
Raigad News : पारंपरिक भाताबरोबरच पौष्टिक गुणधर्मामुळे सध्या काळा, लाल आणि जांभळ्या रंगाच्या भातलागवडीवर भर दिला जात आहे. रायगड जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी २३ हेक्टर क्षेत्रावर नावीन्यपूर्ण योजनेतून लाल, काळ्या भाताची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी ‘आत्मा’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काळा, लाल आणि जांभळ्या रंगाच्या भाताच्या जातींचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
२०१९ पासून आतापर्यंत रंगीत भाताच्या लागवडीचे क्षेत्र २१० हेक्टरपर्यंत वाढले आहे. यंदाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून हळद, ड्रॅगन फ्रूट, करटोली, काळीमिरी यांसारख्या पिकांचा समावेश केला आहे. म्हसळा तालुक्यात तीन हेक्टर जागेत नावीन्यपूर्व योजनेतून तर रोहा तालुक्यात २० हेक्टर क्षेत्रात लाल, काळा भाताची पेरणी झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.
पावसाचे आगमन लवकर झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी भात पेरणीची कामे रखडली आहेत. शेतात पाणी साचल्याने धूळ वाफ्यावरील पेरणी करता आलेली नाही. अशाही परिस्थितीत जिल्ह्यात ६० टक्के पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात यंदा एक लाख २४ हजार हेक्टर भातलागवडीचे नियोजन होते; परंतु इतक्या क्षेत्रासाठी पुरेशी पेरणी न झाल्याने यंदा भाताची रोपे कमी पडण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे; मात्र अशा बिकट परिस्थितीत नावीन्यपूर्व योजनेतून रंगीत भाताची पेरणी करण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे.
भाताची उत्पादकता आणि उत्पादन वाढावे, यासाठी कृषी विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आधुनिक भातलागवड पद्धती आणि संकरित बियाण्यांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे; मात्र अजूनही पारंपरिक बियाण्यांच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना संकरित बियाणे लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
‘आत्मा’ योजनेंतर्गत लाल, काळा आणि जांभळ्या रंगातील भात उत्पादन घेतले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना संकरित भात बियाणे उपलब्ध करून दिले आहे. मध्य प्रदेश आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून बियाणे मागवण्यात आले होते. या बियाण्यांचा वापर करून यंदा २३३ हेक्टरवर लाल, काळ्या आणि जांभळ्याभातपिकाची लागवड केली आहे. यातून उत्पादित होणाऱ्या भातपिकाच्या मार्केटिंगचे प्रयत्नही कृषी विभागामार्फत सुरू आहेत.
गुणकारी रंगीत तांदूळ
लाल, काळ्या आणि जांभळ्या रंगाच्या भातात प्रथिने आणि कर्बोदकांचे प्रमाण सामान्य भाताच्या तुलनेत अधिक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. हा भात मधुमेह आणि इतर आजारांतील रुग्णांसाठी उपयुक्त असल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे अलीकडच्या काळात या भाताची मागणी वाढली आहे.
त्यामुळे रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात लाल, काळ्या आणि जांभळ्या रंगाच्या भाताची लागवड करण्यात आली आहे. यास पांढळ्या तांदळापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने कमी मेहनतीमध्ये चांगले उत्पन्न मिळवण्यात शेतकऱ्यांना यश येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.