
Delhi News : हरियाणा पोलिसांनी शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेकऱ्यांनी रोखून धरले आहे. पण आता पुन्हा एकदा १०१ शेतकऱ्यांचा गट १४ डिसेंबरला दिल्लीकडे कूच करेल, अशी घोषणा शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी केली आहे. दरम्यान १५ दिवसापासून आमरण उपोषणावर बसलेले शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उद्या (ता.१२) देशातील शेतकऱ्यांना चूल न पेटवण्याचे आवाहन केले आहे.
हमीभाव कायदा, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासह भूसंपादन आणि नुकसान भरपाईच्या मागणीसाठी किसान मजदूर मोर्चा आणि एसकेएमच्या नेतृत्वात विविध शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. शंभू सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून 'दिल्ली चलो'चा नारा दिला आहे. पण हरियाणा पोलिसांनी पुन्हा एकदा रविवारी (ता.८) अश्रुधुराचा मारा करत शेतकऱ्यांना रोखले. यावेळी शंभू सीमेवर बॅरिगेटींग करत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान हरियाणा पोलिसांनी रबरी गोळ्यांसह अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार केले जात आहेत. यामुळे दोन वेळा दिल्ली चलो मोर्चा स्थगित करण्यात आला होता. मात्र आता १०१ शेतकऱ्यांचा एक गट १४ डिसेंबर रोजी शंभू सीमेवरून दिल्लीकडे निघणार असल्याचे पंढेर यांनी मंगळवारी (ता.१०) सांगितले आहे.
पंढेर यांनी सांगितले की, शंभू सीमेवरील आमच्या आंदोलनाला ३०३ दिवस पूर्ण झाले आहेत. तर शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांच्या आमरण उपोषणाचा १५ दिवस झाले आहेत. आम्ही सरकारशी नेहमीच संवाद साधला आहे. तर त्यांचे स्वागत ही केले आहे. पण सरकारकडून कोणताच संवाद होताना दिसत नाही. यामुळे आता पुन्हा एकदा १०१ शेतकऱ्यांचा एक गट दिल्लीकडे पाठवू. तर यावेळी आमचे आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी प्रार्थना आम्ही प्रार्थना करत आहोत.
आमची प्रमुख मागणी हमीभाव कायदा, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासह भूसंपादन आणि नुकसान भरपाई मिळावी अशी आहे. तर आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांची सुटका व्हावी अशीही आमची मागणी आहे. तर आता आमच्या या आंदोलनाला अभिनेते, गायक आणि धार्मिक नेत्यांनी पाठिंबा द्यावा, अशी विनंती करू इच्छितो असेही पंढेर यांनी म्हटले आहे.
दरम्यान खनौरी सीमेवर शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच आहे. मंगळवारी उपोषणाला १५ दिवस पूर्ण झाले असून आंदोलनस्थळी सामुदायिक भोजन झालेले नाही. यामुळे डल्लेवाल यांच्यासह इतर उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावली आहे. तर डल्लेवाल आधीच कर्करोगाचे रुग्ण असून त्यांची प्रकृती सतत खालावत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
यावेळी डल्लेवाल यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आता आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याची माहिती दिली आहे. तर १२ डिसेंबरला देशातील शेतकऱ्यांनी आपली चूल एक वेळ बंद ठेवून सरकार्य करत आंदोलनाचा भाग व्हावे असे आवाहन केले आहे. तसेच #WeSupportJagjeetSinghDallewal असा संदेश लिहत आपला फोटो समाजमाध्यमावर पोस्ट करावा, असेही आवाहन जगजित सिंग डल्लेवाल यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.