
Pune News : पुणे जिल्ह्यातील भोर आणि वेल्हा तालुक्यात बांबू लागवड लोकप्रिय असली तरी मोठी संधी असूनही उर्वरित पुणे जिल्ह्यात बांबू लागवड झालेली नाही. या पुढील काळात क्षेत्रिय स्तरावर कर्मचाऱ्यांना व्यक्तीशः लक्ष्य (टार्गेट) देऊन पुणे जिल्ह्यात मराग्रारोहयो अंतर्गत बांबू लागवडीचे ध्येय निश्चित करण्याचे पुणे जिल्ह्यातील यंत्रणांनी ठरवले असल्याची माहिती मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवड अभियान विषयक आढावा बैठक नुकतीच (ता. ९) पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते, हवामान विभागाचे प्रमुख के. सी. साई कृष्णन, शास्त्रज्ञ डॉ. कृपाण घोष, डॉ. ओ. पी. श्रिजीत, भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप, आरती बंडकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे, कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील, कृषी उपसंचालक सं. स. विश्वासराव आदी उपस्थित होते.
श्री. पटेल म्हणाले, की पुणे जिल्ह्यामध्ये क्षमता असूनही बांबू लागवडीमध्ये दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. वातावरण बदलाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. इस्राईलमधील तेल अविव आणि अमेरिकेत कैलिफोर्निया येथे आग लागली.
२०२४ हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले असून दिल्लीचे तापमान ५२.९ अंशांपर्यंत गेल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. ४७ अंश तापमानामध्ये माणूस मरतोय. दुबई होरपळतेय तिथे तापमान ६५ अशांपर्यंत पोहोचले आहे. एकंदरीतच वातावरण बदलाच्या संकटामुळे मानवजातीसमोरचे सगळे मार्ग खुंटले आहेत.
कार्बन इमिशन (उत्सर्जन) दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगत ते म्हणाले, की २०५० पर्यंत समुद्र किनारी असणारे देश आणि शहरे बुडणार आहेत. कोळसा आधारित औष्णिक प्रकल्प बंद करावे लागणार आहेत. सर्वांनाच आता पर्यावरणपूरक वस्तू वापराव्यात लागणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वेगाने वाढणारा बांबू एकमेव गवतवर्गीय वृक्ष असून बांबू बहुउपयोगी ठरत आहे.
पुणे जिल्ह्याचा विचार करता फक्त भोर आणि वेल्हा तालुक्यांमध्ये पारंपारिकरित्या बांबूच्या लागवडी होत आहेत. परंतु क्षमता असूनही शिरूरसह आंबेगाव आणि जिल्ह्यातील अनेक भागांत ज्या ठिकाणी सिंचनातून जमिनी नापीक झाल्या, अशा भागात देखील बांबू लागवडीसाठी मोठी संधी आहे. प्रत्येक यंत्रणेमध्ये क्षेत्रीय पातळीवरील कर्मचाऱ्यांना टार्गेट देऊनच यापुढील काळात बांबू लागवडीचे ध्येय गाठले जाईल.
डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते म्हणाल्या, की वर्ष २०२४-२५ साठी ३०० हेक्टर उद्दिष्ट देण्यात आले होते. तर २०२५-२६ साठी ४५० हेक्टर उद्दिष्ट देण्यात आले. एकूण पाच वर्षांतील तीन हेक्टर उद्दिष्टापैकी २०२४-२५ मध्ये १३३.६ हेक्टर इतकी लागवड झाली आहे. या वर्षी सर्व यंत्रणांना मागील वर्षीचे शिल्लक उद्दिष्ट व या वर्षीच्या उद्दिष्टानुसार सर्व यंत्रणांना जास्तीचे उद्दिष्ट वाटप करून प्रति ग्रामसेवक, कृषी सहायक, आरएफओ व मृद व संधारण आणि जलसंपदा विभागाला उद्दिष्ट देऊन यावर्षी एक हजार हेक्टरचे उद्दिष्ट साध्य केले जाईल.
डॉ. सानप म्हणाले, की औद्योगिक विकासाने कार्बन उत्सर्जन वाढले आहे. पारंपरिक उर्जा स्रोत वापराने कार्बन उत्सर्जन वाढले. त्यामुळे वातावरण बदल होऊन कृषी क्षेत्राला वातावरण बदलाचा मोठा फटका बसत आहे. तापमानातील वाढ, कमी कालावधीत जास्त पाऊस, ढगफुटी, वादळे हे घटक शेतीबरोबरच आरोग्य, वनक्षेत्र आणि जलसंधारण या विभागांना प्रभावित करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.