
Pune News: शेतीमध्ये नवीन ‘एआय’चे तंत्रज्ञान आले आहे. त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतीतील खर्च, खत, पाणी यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार असून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यंदा राज्यात एआय तंत्रज्ञान प्रसारासाठी पाचशे कोटींची तरतूद केली आहे. येत्या काळात आवश्यक वाटल्यास पुरवणी मागण्यांमध्ये अधिकची तरतूद केली जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुणे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत ‘दिशा कृषी उन्नतीची @२०२९’ या कार्यक्रमाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते सोमवारी (ता. २१) झाला. त्यावेळी श्री. पवार बोलत होते. या वेळी सेवादूत अॅप, व्हॉट्सअॅप चॅनलच्या क्यूआर कोडचे विमोचन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी विभागाचे कृषी विस्तार विभागाचे संचालक रफिक नाईकवडी, राज्य सहकारी बँकेचे सल्लागार विद्याधर अनास्कर, प्रशांत गिरभणे, मुंबई मराठा चेबर्स ऑफ कॉमर्सचे राजन राजे, इस्राईलच्या नेचर ग्रोथचे चेतन डेडीया, बॅंक ऑफ महाराष्ट्राचे सरव्यवस्थापक देवदत्त रोकडे, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने, आमदार बापूसाहेब पठारे, पुणे कृषी महाविद्यालयाचे डॉ. महानंद माने, किसान फोरमचे अतुल मारणे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की पुणे जिल्ह्यासाठी पहिल्यांदा अॅग्री हॅकेथॉन घेतले जात आहे. त्यानंतर टप्याटप्याने राज्यभर हे राबविण्यात येणार आहे. कारण पुणे जिल्ह्यात विविध पिके घेतली जात आहे. त्यासाठी विविध पिकांसाठी क्लस्टर तयार करण्यात आले आहे. त्याला प्रक्रिया उद्योग जोडले जाणार असून निर्यातीसाठी मदत केली जाईल. त्यातून शेतकऱ्यांना चांगली मदत होईल.
जग झपाट्याने बदलत आहे. शेतीक्षेत्र सुद्धा बदलत असून शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सची जोड देणे ही काळाची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांना शाश्वत विकासासाठी शेती क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधन होणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यालाही आम्ही प्रोत्साहन देतोय. शेतीला अनुभव आणि शिक्षणाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तर त्याचा मोठा फायदा शेतकऱ्याला होणार आहे, असेही अजित पवार म्हणाले.
कृषिमंत्री अॅड. माणिकरावे कोकाटे म्हणाले, की कृषिमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर दोन ते तीन विभागाच्या कामांचा आढावा घेणे बाकी आहे. येत्या काळात शासनाचे नवीन धोरण करण्याचे काम सुरू आहे. आज शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत. ‘एआय’ सारखे नवीन तंत्रज्ञान आले असताना वातावरणामध्ये होणारे हवामान बदल महत्त्वाचे आहे. हे बदल शेतीवर फार मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण करत आहे. शेतीवरील आक्रमण थांबवण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे. जेणेकरून बदलत्या वातावरणाला सुद्धा शेतकऱ्यांना सामोरे जाता येईल.
कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी म्हणाले, की कृषी क्षेत्र सुधारल्याशिवाय विकासदर वाढणार नाही. यासाठी नुकतीच पुण्यात खरिपाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी, अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली होती. येत्या खरिपात शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचता येईल याचे कृषिमंत्री यांनी निर्देश दिलेले आहे.
‘काही शेतकऱ्यांनी सरकारला चुना लावला’
शासनाने एक रुपयात विमा योजना सुरू केली होती. त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला असला तरी या योजनेत काही शेतकऱ्यांनी गैरफायदा घेतला आहे. गावरान भाषेत सांगायचे तर ‘शेतकऱ्यांनी सरकारला चुना लावला’ आहे. त्यामुळे या योजनेत बदल करून गैरफायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांवर चाप लावणार आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.