Nagpur News : मॉन्सूनोत्तर पाऊस आणि सिंचनाच्या सोयींमुळे शेतकऱ्यांनी आवश्यकवेळी पिकाला पाणी दिले. परिणामी देशासह राज्यात कापसाची उत्पादकता वाढल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
त्यामुळेच देशात सरासरी ३०० लाख गाठींची उत्पादकता अपेक्षित असताना आता ती ३२० लाख गाठींपर्यंत पोचेल, असा अंदाज युनायटेड स्टेटस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर (युएसडीए) कडून वर्तविण्यात आला आहे.
देशात सरासरी १३० लाख हेक्टरवर तर महाराष्ट्रात ४५ ते ४८ लाख हेक्टर त्यातही विदर्भात सुमारे १८ लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. एकट्या यवतमाळ जिल्ह्याचे कापसाखालील क्षेत्र पावणेपाच लाख हेक्टर आहे. २०२३-२४ या वर्षातील खरीप हंगामात सुरवातीला पावसाने खंड दिला. त्यामुळे सर्वच पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या. त्यानंतर पावसाची संततधार झाली.
या दोन्ही कारणांमुळे खरिपातील पिकांची उत्पादकता प्रभावित होईल, अशी भीती वर्तविली जात होती. त्यानुसारच कापसाच्या उत्पादकतेबाबत वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यानुसार आराखडे बांधले जात होते. त्याच आधारावर कापसाची उत्पादकता यंदा ३०० लाख गाठींची राहील, असा अंदाज वर्तविला गेला.
दरम्यान, जागतिकस्तरावर कापसाचा साठा संपत आल्याचे सांगत देशांतर्गत कापूस दरवाढ होत असल्याबाबत विपणन तज्ज्ञांनी मत व्यक्त केले होते. या साऱ्या घडामोडीत आता ‘युएसडीए’कडून सुधारित अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार भारतात कापूस उत्पादकता पूर्वीच्या ३०० लाख गाठींवरुन ३१५ ते ३२० लाख गाठींपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
‘सीसीआय’कडून विक्रमी खरेदी
२०२०-२१ या कोरोना कालावधीत भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) कडून विक्रमी ८० लाख गाठींची कापूस खरेदी झाली. त्यानंतर यंदाच २५ लाख गाठी इतका कापूस खरेदी केला गेला. कोरोनानंतर यंदा पहिल्यांदाच ‘सीसीआय’ने विक्रमी खरेदी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.